डोंबिवली येथे होणाऱ्या नव्वदाव्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी कवी प्रवीण दवणे यांचे नाव सुचविणारा अर्ज शुक्रवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेत दाखल झाला. दवणे यांनी परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्याकडे अर्ज सुपूर्द केला.
दवणे यांच्या अर्जावर सूचक म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांची स्वाक्षरी आहे तर, अनुमोदक म्हणून प्रा. प्र. ल. गावडे, माधव राजगुरू, बाळासाहेब कारले, वर्षा तोडमल आणि देवयानी अभ्यंकर-कुलकर्णी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यापूर्वी नागपूर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यालयात ज्येष्ठ समीक्षक डॉ. अक्षयकुमार काळे यांचे नाव सुचविणारा अर्ज दाखल झाला आहे. तसेच डॉ. मदन कुळकर्णी, डॉ. रवींद्र शोभणे व साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या नावाची चर्चा आहे. डॉ. कसबे यांनी निवडणूक लढवायला नकार दिला आहे.
साहित्य महामंडळाचे कार्यालय विदर्भ साहित्य संघाकडे गेल्याने विदर्भातील साहित्यिकाला अध्यक्षपदाचा मान मिळतो की संमेलन डोंबिवलीत होणार असल्याने अध्यक्षपदावर पुण्या-मुंबईचेच वर्चस्व राहणार, याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. संमेलन डोंबिवलीत असल्याने दवणे यांना फायदा होऊ शकतो, असे बोलले जात आहे.
-----------------
टिळा लागावा किंवा मुकूट म्हणून मला अध्यक्षपद नको आहे. हे कार्याचे पद आहे. अध्यक्षपद हे वाड्.मयीन चळवळीचे केंद्र झाले पाहिजे. मी मधल्या पिढीचा असल्याने ज्येष्ठ आणि तरुण पिढीशी संवाद साधू शकतो. ग्रामीण भागातील तरुण संधीसाठी तसेच लेखक, समीक्षक, प्रकाशक यांच्या संवादाअभावी कोमेजून जात आहेत. मराठी भाषा विरत असेल तर माझ्यासारख्यांनी उभे राहणे गरजेचे आहे. निवडणुकीत श्रेष्ठ साहित्यिक उभे राहिले तर, माझी माघार घ्यायची तयारी आहे.
-प्रवीण दवणे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट