म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरातील साठवण टाक्या आणि जुन्या जलवाहिन्या बदलल्यानंतरच पाण्याचे मीटर बसविण्यात यावेत, या मागणीचा पुनरूच्चार करून राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांनी महापौर प्रशांत जगताप आणि आयुक्त कुणाल कुमार यांना शुक्रवारी सविस्तर निवेदन दिले. शहरात २४ तास पाणीपुरवठा सुरू करण्यापूर्वीच मीटर बसविणे चुकीचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेने समान पाणीपुरवठा योजना (२४ बाय ७) राबविण्याच्या पहिल्या टप्प्याची नुकतीच सुरुवात केली आहे. त्यानुसार, शहरात नव्याने ८२ टाक्या बांधण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण होण्यास सुमारे अडीच वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तसेच, टाक्यांसोबतच शहरातील तब्बल सोळाशे किमीच्या जलवाहिन्या बदलणे क्रमप्राप्त आहे. हे काम पूर्ण होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. त्यानंतरच, पुणेकरांना २४ तास पाणी मिळू शकणार असल्याने मीटरची योजना कामे पूर्ण झाल्यावरच कार्यान्वित करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. २४ तास आणि पुरेशा दाबाने पाणी मिळत नसल्यानेच पूर्वी मीटर पद्धती बंद केली होती. त्यामुळे, पुन्हा २४ तास पाणी मिळण्यापूर्वीच पुणेकरांवर मीटरची सक्ती लादणे अन्यायकारक असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
मीटर बसविण्याच्या महापालिकेच्या अट्टाहासाचा फटका पुणेकरांना बसू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच, नव्याने घेण्यात येणाऱ्या मीटरची वॉरंटी केवळ वर्षाचीच असल्याचे समजते. महापालिकेच्या नियोजनानुसार २४ तास पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वीच हा कालावधी संपुष्टात येणार आहे. तरीही, मीटरची घाई कशासाठी, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी उपस्थित केला आहे.
.............
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट