'मराठवाडा हा १९४८ मध्ये मुक्त झाला; पण अजूनही त्याला कितीतरी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दुष्काळाचा सर्वात जास्त त्रास मराठवाड्याला भोगावा लागत आहे. त्यामुळे सध्या मराठवाड्यातील पाणी प्रश्नासाठी लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन भांडण्याची गरज आहे,' असे परखड मत अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी भोसरीमध्ये व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध संघटनांच्या वतीने एकत्र येऊन भोसरीमध्ये मराठवाडा मुक्तिदिन महोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी शनिवारी (१७ सप्टेंबर) अनासपुरे बोलत होते. या वेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, पश्चिम महाराष्ट्र भाजप संपर्क प्रमुख एकनाथ पवार, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार महेश लांडगे, नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेवक धनंजय आल्हाट, माजी आमदार विलास लांडे, पत्रकार विलास बढे, समितीचे अध्यक्ष राजेंद्र कोरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी मकरंद अनासपुरे म्हणाले, 'मराठवाड्यातील माणसांमध्ये सहनशीलता आहे; पण अति सहनशीलता ही चुकीची आहे. त्यामुळे तेथील प्रश्नांना तरुण लोक प्रतिनिधींनीही वाचा फोडली पाहिजे. मागील तीन वर्षे नाही तर २०१२ पासूनच दुष्काळाच्या समस्येने मराठवाड्याला ग्रासले आहे, आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळेच मराठवाड्यामध्ये नाम फाउंडेशन अंतर्गत काम करताना लोकसहभाग हा जास्त महत्वाचा आहे. तेथील बांधवांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहिले की, आपण केलेल्या कामाचे समाधान वाटते,' असेही ते म्हणले.
तसेच 'शहरामध्ये मराठवाड्यामधून शिक्षणासाठी येणारे बरेच विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी हॉस्टेल आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी बाजारपेठांची व्यवस्था केली जावी,' अशी विनंतीही त्यांनी या वेळी केली. त्याचप्रमाणे मराठवाड्याला हुंड्याचा मोठा शाप आहे, असे सांगत हुंडा न घेण्याचेही आवाहन केले. अशा मंचावर येऊन नुसते एका दिवसापुरते साजरे करून न थांबता एकत्र येऊन विचार मंथन करावे, आणि ही चळवळ अशीच चालू ठेवावी असे आवाहनही त्यांनी केले.
सुभाष देशमुख यांनी मराठवाडा मुक्तीदिनाच्या शुभेच्छा देत मकरंद अनासपुरे यांनी दिलेल्या संदेशाच्या अनुषंगाने काही करता येईल का या दृष्टीने विचार केला जावा. अनेकाच्या त्यागातून, बलिदानातून हे स्वातंत्र्य मिळालेले आहे, ते टिकवणे हे आपले कर्तव्य आहे. यावेळी मराठवाड्यातील बांधवांना आपण गरीब किंवा मागास आहेत, असे कधीही सांगू नका तर देवाने प्रत्येकाला विशिष्ट वरदान दिले आहे. मराठवाड्यातील नागरिकांनीही आपण ताकदवान आणि संघटीत आहोत,' असे म्हणले पाहिजे असे आवाहन केले. त्याचबरोबर मराठवाड्याच्या आसपासच्या परिससरातून विविध प्रकाराने नैसर्गिक देणे मराठवाड्याला लाभले आहे पण त्याची योग्य कदर न केल्यामुळे आपण मागे पडलो, पुढील काळात मराठवाड्यातील मुलांकडून मराठवाड्यात काय काय पिकते, काय काय तयार होत आहे त्याची प्रदर्शने भरवावीत, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली.
डॉ. श्रीपाल सबनीस हे स्वतः मराठवाड्याचे आहेत. त्यामुळे कार्यक्रमाला प्रोत्साहन देत कौतुक केले. तसेच इतक्या योग्य लोकांना एकत्रित करून तसेच १७ मंडळांनी एकत्र येऊन घेतलेला कार्यक्रम म्हणजे उल्लेखनीय गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.
या वेळी वनिता मोहिते यांच्या संजीवनी महिला शाहिरी पथकाचा शाहिरी मुजरा हा कार्यक्रम झाला. तसेच यावेळी एकनाथ पवार, पत्रकार विलास बढे, सुलभा उबाळे, विलास लांडे, शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. राजेंद्र कोरे यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम दंडीमे यांनी केले तर शिवहार मरे यांनी आभार मानले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट