'देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी केवळ 'मेरा भारत महान'च्या घोषणा देण्यापेक्षा प्रत्येक भारतीयाने आपल्या कामावर अधिक लक्ष द्यावे,' तरच त्या घोषणेला खरा अर्थ प्राप्त होईल, असे खडेबोल इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आज सुनावले. 'धर्मनिरपेक्षता, उदारमतवाद, सहिष्णुता ही उदात्त मुल्ये लहान मुलांच्या मनावर वेळीच कोरायला हवीत,' अशा शब्दांत मूर्ती यांनी देशातील सद्यस्थितीवर नेमकेपणाने भाष्य केले.
पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. फेस्टिव्हलच्या संयोजन समितीचे सदस्य डॉ. रघुनाथ माशेलकर, संयोजिका डॉ. मंजिरी प्रभू, यावेळी उपस्थित होते. यशदा येथे आयोजित हा महोत्सव ४ सप्टेंबरपर्यंत रंगणार आहे.
महोत्सवाच्या उद्घाटनानंतर मूर्ती यांची मुलाखत रंगली. याप्रसंगी बोलताना मूर्ती यांनी देशातील सद्यस्थितीवरून कानपिचक्या दिल्या. 'आपल्या देशाने भांडवलशाही अर्थव्यवस्था आता स्वीकारली आहे. १९९१ नंतर झालेल्या या आर्थिक बदलामुळे जगातील आपण एक शक्ती होऊ शकतो, याची जाणीव भारतीयांना झाली आहे. उदारीकरणाचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. अशा काळात केवळ 'मेरा भारत महान'च्या घोषणा देण्यापेक्षा प्रत्येक भारतीयाने आपले काम लक्षपूर्वक करावे,' असे खडे बोल मूर्ती यांनी सुनावले.
'युरोपियन महासंघाप्रमाणे दक्षिण आशियेतील देशांची संघटना स्थापन झाली तर भारतासह गरीब देशांचा विकास होईल. दक्षिण आशियातील गरीब देशांना एका व्यासपीठाची गरज असून ते राजकीय असावेच असे नाही,' याकडे त्यांनी लक्ष वेधले.
उद्घाटनसत्रात मूर्ती यांनी 'साहित्य आणि समाज' यांचा परस्परसंबंध उलगडून दाखवला. 'चांगल्या समाजासाठी व आदर्श नागरिक घडवण्यासाठी साहित्य महत्त्वाचे असते. आयुष्यात चुका कशा टाळाव्यात, हे सर्व धर्मग्रंथ सांगतात. साहित्यामुळे विविध विचार समजतात तसेच सभ्यता व संस्कृती अंगी येते, असेही मूर्ती यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट