गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुण्यात यंदा अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत विशेष फेरीचीही तिसरी फेरी होणार आहे. त्यानंतर दहावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी म्हणूनही एक फेरी होणार आहे. त्यामुळे केवळ तीनच ऑनलाइन फेऱ्यांमध्ये संपण्याची अपेक्षा असलेली ही प्रक्रिया आता सात फेऱ्यांवर जाणार आहे.
अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नियंत्रण समितीने मंगळवारी प्रक्रियेच्या दुसऱ्या विशेष फेरीमधील प्रवेश निश्चिती अंतिम केली. त्यानंतरही अद्याप दीड हजारांवर विद्यार्थी गुणवत्तेनुसार कॉलेज निश्चिती मिळण्याच्या प्रतीक्षेमध्येच असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश निश्चिती देण्यासाठी म्हणून तिसरी विशेष फेरी घेण्याचा निर्णय समितीने घेतल्याचे समितीकडून बुधवारी सायंकाळी उशिरा सांगण्यात आले.
समितीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार, बुधवारी दुपारी २ वाजता दुसऱ्या विशेष फेरीनंतर कॉलेज पातळीवर रिक्त राहिलेल्या जागांचा तपशील जाहीर होणार आहे. त्या आधारे गुरुवारी सायंकाळी ६ पर्यंत तिसऱ्या विशेष फेरीसाठी ऑनलाइन पसंतीक्रम पुन्हा नोंदविण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळेल. विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जांच्या आधारे शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता तिसऱ्या विशेष फेरीची कॉलेज निश्चिती जाहीर होईल. विद्यार्थ्यांनी या फेरीसाठी कॉलेजांचे पसंतीक्रम नोंदविताना कॉलेजांचे कट्ऑफ विचारात घेऊन अर्ज भरण्याचे आवाहनही
समितीने केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट