Mustafa.Attar@timesgroup.com
पुणेः 'अन्न हे पूर्ण ब्रम्हः' असे म्हटले जात असले तरी शहरातील हजारो छोट्या मोठ्या खानावळी, हॉटेलपासून ते फाईव्ह स्टार हॉटेल, मंगल कार्यालये, डायनिंग हॉल आणि बँक्वेट हॉलमधून दररोज साठ हजार व्यक्तींचे जेवण फेकून देण्यात येत आहेत. म्हणजेच सुमारे आठशे टन एवढे अन्नपदार्थ दररोज फेकून देण्याची वेळ हॉटेलचालकांवर येत असल्याची माहिती पुढे आली आहे.
नियोजित निमंत्रितांपैकी अथवा हॉटेलमध्ये येणाऱ्या अपेक्षित ग्राहकांच्या संख्येत फरक पडल्याने अन्न फेकून देण्याची वेळ येत असल्याचे निरीक्षण या क्षेत्रातील जाणकारांनी नोंदविले आहे.
'एखादा व्यक्ती नाश्ता आणि दोन वेळचे जेवण असे मिळून दिवसभरात सव्वाकिलो एवढे अन्न खातो. तेवढीच त्याला भूक असते. त्यानुसार घरगुती खानावळी, मेस, छोटे मोठे हॉटेल, बँक्वेट हॉल, मंगल कार्यालये, थ्री, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये साधारण अंदाजाने जेवण तयार केले जाते. परंतु, दररोज ग्राहक किती येईल, एखाद्या कार्यक्रमासाठी बोलाविलेल्या निमंत्रितांपैकी किती येतील याचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे प्रामुख्याने मंगल कार्यालये, बँक्वेट हॉल, डायनिंग हॉल, मेसमध्ये प्रत्येकी पाच ते सात किलो उपयोगी अन्न वाया जाते अथवा फेकून देण्याची वेळ येते. म्हणजेच दररोज आठशे टन अन्न वाया जात आहे,' अशी माहिती पुणे रेस्टॉरंट अॅन्ड हॉटेलियर्स असोसिएशचे सचिव किशोर सरपोतदार यांनी 'मटा'ला दिली.
आठशे टन खाद्यान्नांमध्ये प्रामुख्याने कांदा, लिंबू असलेले सॅलेड, ग्रेव्ही, सांबार, मिसळ रस्सा, तयार भाज्या, डाळी, पोळ्या, भात, चटण्या तसेच इडली डोसाचे पीठ आदींचा समावेश असतो. प्रत्येक हॉटेल, रेस्टॉँरटना साधारण अंदाजाने अन्न पदार्थ तयार करावे लागतात. पंजाबी अथवा चायनीजच्या हॉटेलमध्ये कच्चे साहित्य तयार असते. त्या ठिकाणी ऑर्डरनुसार दहा मिनिटात खाद्यपदार्थ तयार करून दिले जातात. त्यामुळे त्या हॉटेलमधून अन्नपदार्थ फेकून देण्याची फारशी वेळ येत नाही. या सर्व ठिकाणाहून मिळून हे आठशे टन एवढे अन्न वाया जात आहे. तर लग्नाचे मुहूर्त असल्यानंतर शहरातील सर्व मंगल कार्यालये तसेच थ्री फाईव्ह स्टार हॉटेल फुल्ल असतात. त्यावेळी देखील दुप्पटीने अर्थात पंधराशे टनापर्यंत खाद्यान्न वाया जाते, अशी धक्कादायक माहिती देण्यात आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट