म. टा. प्रतिनिधी, पुणे
'पुण्यातील प्रदूषण आणि अपघातांच्या संख्येतही गेल्या काही वर्षांत मोठी वाढ झाली आहे. पुण्यातील प्रदूषण आणि अपघातांची संख्या कमी करण्यासाठी पुण्याने पुढाकार घ्यावा. मी त्यासाठी संपूर्ण सहकार्य करेन,' असे आश्वासन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिले. शहरातील अपघातांसाठी जबाबदार ब्लॅक स्पॉटची माहिती कळविण्याचे आवाहन करतानाच सरकारच्या पाच वर्षांत पुणे विभागात एक लाख कोटी रुपयांची रस्त्यांची कामे करण्यात येतील,' असेही गडकरी यांनी स्पष्ट केले.
खासदार अनिल शिरोळे यांनी दोन वर्षांत केलेल्या कार्याच्या अहवालाचे प्रकाशन गडकरी यांच्या हस्ते झाले. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील, पालकमंत्री गिरीष बापट, खासदार अमर साबळे व संजय काकडे, भाजपचे प्रदेश संघटनमंत्री रवींद्र भुसारी, शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्यासह भाजपचे आमदार, पदाधिकारी आदी या वेळी उपस्थित होते. धीरज घाटे यांनी सूत्रसंचालन केले.
'केंद्राच्या राखीव निधीतून महाराष्ट्राला नऊ हजार कोटी रुपये देण्यात येतील. त्यापैकी दहा टक्के निधी हा ब्लॅक स्पॉट्सच्या दुरुस्तीसाठी देण्यात येईल. वाहतूक मंत्रालयाने अपघात निवारण समिती स्थापन केली आहे. ग्रामपंचायतीच्या रस्त्यांपासून राष्ट्रीय महामार्गांपर्यंतच्या सर्व रस्त्यांवरील ब्लॅक स्पॉट्सची दुरुस्ती या निधीतून केली जाईल,' असे गडकरी यांनी स्पष्ट केले. महामार्गांलगत झाडे लावण्यासाठी पाच हजार कोटींची तरतूद केल्याचेही त्यांनी सांगितले.
'कॉँग्रेसप्रणित आघाडी सरकारने ज्या-ज्या क्षेत्रात घोटाळे केले. त्या क्षेत्रांमध्ये मोदी सरकारने भ्रष्टाचार मोडून काढून पारदर्शक पद्धतीने काम केले आहे, हाच दोन्ही सरकारमधील फरक आहे,' असे जावडेकर यांनी सांगितले.
'गडकरी यांचा वाहतूक विभाग सर्वोत्तम काम करत असून हा विभाग येत्या तीन वर्षांत देशाचा चेहरामोहराच बदलून टाकेल,' असे दानवे यांनी सांगितले.
'रामभाऊ म्हाळगी यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार मी केलेल्या कामाचा अहवाल दिला आहे,' असे शिरोळे यांनी सांगितले.
कार्यक्रमाला विलंब
सर्वसामान्य पुणेकर व इतर व्यक्ती तीन वाजल्यापासून बालगंधर्वमध्ये उपस्थित होते. गडकरींच्या हस्ते चार वाजता अहवालाचे प्रकाशन होणे अपेक्षित होते. मात्र, पूर्वीचे कार्यक्रम लांबल्याने गडकरी पावणेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात दाखल झाले. पाच वाजता कार्यक्रम सुरू झाला. तो पर्यंत त्रस्त झालेल्या काही उपस्थितांनी खास पुणेरी टाळ्या वाजवत तसेच 'कार्यक्रम आजच आहे ना', 'गडकरी येणार आहेत की आम्ही जाऊ,' अशी विचारणाही केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट