आंतरजातीय विवाह केल्याचा राग मुलीच्या घरच्यांनी मनात ठेवून तिला आठ दिवस घरामध्ये डांबून ठेवले. पण, पतीने वकिलामार्फत पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने मुलीला आठ दिवसांनंतर पतीच्या घरी तिच्या घरच्यांनी सोडले. सिंहगड रोड पोलिसांकडे नुकतेच हे प्रकरण आले होते.
प्रियांका आणि राजेश (दोघांची नावे बदललेली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. राजेश नोकरी करतो. धायरी येथील एका कॉलेजमध्ये तीन वर्षांपूर्वी त्यांची ओळख झाली होती. त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यांनी लग्न करण्याचे ठरविले. त्यांनी त्याबद्दल आपल्या घरच्या लोकांना कल्पना दिली. मात्र, जात वेगळी असल्यामुळे तिच्या वडिलांचा लग्नाला विरोध होता. वडिलांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी मुलीचे बरे-वाईट करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्या दोघांनी २०१५मध्ये लग्न केले. प्रियांकाच्या जिवाला तिच्या घरच्या लोकांकडून जिवाला असलेला धोका मात्र संपला नव्हता. लग्न झाल्यानंतरही तिने घरच्या लोकांना समजाविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता.
काही दिवसांपूर्वी वडिलांच्या घरी आठ दिवस जाऊन येते, म्हणून ती गेली. मात्र, ठरल्यानुसार ती परत आली नाही. पतीने फोन करून तिच्याशी संवाद साधला. तिने आपल्याला घरात डांबून ठेवल्याचे सांगितले. तसेच, येथून आपल्याला घेऊन जाण्याची विनंती केली.
'कायद्याने आपण पती-पत्नी असून सज्ञान आहोत. आपल्या पत्नीला डांबून ठेवण्यात आले असून तिची सुटका करण्यात यावी,' असा अर्ज पतीने अॅड. हेमंत झंजाड आणि अॅड. नितीन झंजाड यांच्यामार्फत दाखल केला. पोलिसांनी त्यांचा अर्ज आल्यानंतर तिच्या घरच्या लोकांना चौकशीसाठी बोलविले. संबंधित जोडपे सज्ञान असून त्यांना एकत्र राहू द्या. तिला त्रास दिल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते, याची कल्पना त्यांना देण्यात आली. त्यानंतर ते तिला परत पाठविण्यास तयार झाले, अशी माहिती अॅड. झंजाड यांनी दिली. सध्या ते दोघे एकत्र राहत असून त्यांचा संसार सुरू झाला आहे.
मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या एका घटनेत पोलिसांच्या दिरंगाईमुळे एका किशोरवयीन मुलाला प्राण गमवावे लागले होते. त्यानंतर संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर पुण्यातील पोलिसांनी उचललेल्या तातडीच्या पावलामुळे डांबून ठेवलेल्या विवाहितेची सुटका झाली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट