म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यभरातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी यंदापासून आयोजित होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षांचा अभ्यासक्रम अखेर मंगळवारी जाहीर झाला. यंदा पहिल्यांदाच 'बालभारती'च्या माध्यमातून छापण्यात आलेल्या स्कॉलरशिपच्या अधिकृत सरकारी पुस्तिकांचेही प्रकाशनही मंगळवारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत केले.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या परिषदेने http://www.mscepune.in या वेबसाइटवरून या दोन्ही परीक्षांचे अभ्यासक्रम आणि परीक्षेतील विविध विषयांची गुणविभागणी जाहीर केली आहे. त्यानुसार दोन्ही परीक्षांसाठी पहिल्या पेपरमध्ये प्रथम भाषा आणि गणिताचा, तर दुसऱ्या पेपरमध्ये तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणीवरील प्रश्नांचा समावेश असेल. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना प्रथम भाषा आणि तृतीय भाषेचे प्रत्येकी २५ प्रश्न, तर गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीचे प्रत्येकी ५० प्रश्न सोडवावे लागतील. या सर्व प्रश्नांना प्रत्येकी २ गुण असतील. त्यानुसार या दोन्ही पेपरमध्ये प्रत्येकी ७५ प्रश्नांचा समावेश असेल. दोन्ही पेपरसाठी एकूण १५० गुण, या पद्धतीने यंदापासून तीनशे गुणांची स्कॉलरशिपची परीक्षा घेतली जाणार आहे.
दोन उत्तरांच्या प्रश्नांचाही समावेश
स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी यंदा पहिल्यांदाच एकापेक्षा अधिक उत्तरे असणाऱ्या प्रश्नांचाही विचार केला जाणार असल्याचे परिषदेने जाहीर केलेल्या स्वरूपावरून स्पष्ट होत आहे. परिषदेने या विषयी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता आठवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेत प्रत्येक पेपरमध्ये जास्तीत जास्त २० टक्के प्रश्नांसाठी चार पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील. हे दोन्ही पर्याय नोंदविणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक असेल. पाचवीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी असा विचार झाला नसल्याचेही परिषदेच्या प्रसिद्धीपत्रकावरून स्पष्ट होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याची मानसिकता जोपासली जावी, याचा विचार करून परिषदेने या अभ्यासक्रमामध्ये काही नव्या बाबींचा समावेश केला आहे. पेपरची संख्या तीनवरून दोनवर आणताना विद्यार्थ्यांचा वेळ वाचविण्याचा विचार करण्यात आला आहे. प्रत्येकी दीड तासांच्या दोन पेपरमध्ये चार विषय समाविष्ट करण्यात आले आहेत, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट