म. टा. प्रतिनिधी, पुणे
पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर टोल आकारणीसाठी होणाऱ्या विलंबामुळे टोल नाक्यांवर वाहनांच्या लागणाऱ्या रांगा कमी करण्यासाठी, खेडशिवापूर येथील टोल नाक्यावर राबविण्यात आलेली 'तीन मिनिटांत टोल'ची योजना येथेही राबवावी, अशी सूचना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) व आयआरबी कंपनीच्या अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच, तुम्हाला शक्य नसेल, तर मला सांगा. मी तिथे येऊन चांगली उपाययोजना करतो,' असेही बजावण्यास राव विसरले नाहीत.
राव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची शुक्रवारी बैठक झाली. बैठकीस वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, अप्पर पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, अजित शिंदे, अनिल वळीव, लोहमार्ग पोलिस, एमएसआरडीसी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. एक्स्प्रेस-वेवरील टोल नाक्यावर जास्त वेळ वाट पाहावी लागते, अशा तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या आहेत. 'एक्स्प्रेस-वेवरील टोल नाक्यावर तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ प्रवाशांना थांबावे लागू नये, अशी यंत्रणा विकसित करा. अन्यथा, जिल्हा प्रशासनाला या मार्गावरील टोलनाक्यांबाबत खेडशिवापूर येथील टोल नाक्याप्रमाणे यंत्रणा विकसित करावी लागेल,' अशी तंबी राव यांनी दिली.
यंत्रणांचा ढिसाळ कारभार !
एक्स्प्रेस-वेवर अलिकडे अपघातांचे प्रमाण वाढले असून, अपघात होण्यास मानवी चुकांबरोबरच पायाभूत सुविधांचा अभाव कारणीभूत आहे. या मार्गावर अनेक ठिकाणी जाळ्या तुटल्या आहेत. त्यामुळे मार्गावर जनावरे येतात. अचानक समोर आलेल्या जनावरांमुळे अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत, असे सांगून राव यांनी संबंधित यंत्रणांच्या ढिसाळ कारभारावरही बोट ठेवले. त्याचबरोबर अलिकडे या मार्गावर दुचाकीस्वारही प्रवास करीत असतात. त्यामुळेही अपघात होतात. वास्तविक, या मार्गावर येणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करावी, असेही ते म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट