म. टा. प्रतिनिधी, पुणे 'शाळा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आहेत, केवळ शिक्षकांचे पगार करण्यासाठी नाहीत,' असा स्पष्ट संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पुण्यात दिला. राज्यात शालेय पातळीवर केंद्रीय पद्धतीने शिक्षकभरतीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून, त्यासाठी नवा कायदाही प्रस्तावित असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या निमित्तानेच स्पष्ट केले.
शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी पुण्यातून राज्यभरातील सहा निवडक शाळांमधील विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या निमित्ताने त्यांनी पालकांच्या शिक्षणाविषयीच्या अपेक्षा जाणून घेतानाच, शिक्षकांकडून असणाऱ्या आपल्या अपेक्षाही व्यक्त केल्या. त्यानंतर फडणवीस यांनी केंद्रीय शिक्षक भरतीसह इतर मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. शिक्षण खात्याचे प्रधान सचिव डॉ. नंद कुमार, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्यासह शिक्षण खात्यातील उच्चपदस्थ अधिकारी या वेळी उपस्थित होते.
प्रस्तावित केंद्रीय शिक्षक भरतीविषयी फडणवीस म्हणाले, 'या बाबत संस्थाचालकांचे काही प्रश्न आहेत. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता आणि या प्रश्नांची उत्तरे शोधून ही प्रक्रिया राज्यात लागू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ज्या शाळांमध्ये सर्व बाबींची पूर्तता, त्याच शाळांना अनुदान दिले जाणार. शाळा या विद्यार्थ्यांसाठी आहेत. शिक्षणावर होणारा खर्च हा उत्तम शिक्षण देण्यासाठी, शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आहे. त्यावर सरकारची नजर राहणार आहे. नव्या पिढीच्या उभारणीसाठी आपण काम करत आहोत, याचे भान ठेवून शाळा आणि शिक्षकांनी काम केले, तर सरकारला अनुदान द्यायलाही बरे वाटेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.'
खात्याविषयी समाधानी
शिक्षण खात्याने गेल्या वर्षभरात केलेल्या प्रगतीविषयी समाधानी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निमित्ताने सांगितले. फडणवीस म्हणाले, 'शिक्षण खात्याला दिलेले उद्दिष्ट खात्याने पूर्ण केले आहे. त्यासाठी शिक्षकांनी जाणीवपूर्वक केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्याविषयी मी समाधानी आहे. अशाच प्रयत्नांच्या आधारे येत्या तीन-चार वर्षांत राज्यभरात सर्व ग्रामपंचायतींपर्यंत वायर्ड नेटवर्क पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्या आधारे राज्यभरात सर्वत्र ऑनलाइन डिजिटल शाळा सुरू करण्याचाही सरकारचा मानस आहे.'
'मंत्रिमंडळात मुलं कशी, हे तुम्हाला माहिती...'
मुख्यमंत्र्यांनी बुधवारी पुण्यात वाघोलीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पहिलीच्या वर्गावर काही काळ शिकविण्याचाही अनुभव घेतला. या अनुभवाविषयी विचारले असता ते म्हणाले, 'शिकवणं एवढं सोप्प नसतं हे आज लक्षात आलं. शिकविताना खूप आनंद वाटला. पहिलीतल्या विद्यार्थ्यांचं ज्ञान चांगलं होता. चौथीच्या विद्यार्थ्यांचा प्रतिसादही चांगला होता. स्वच्छतेविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरुकता दिसली.' या वर्गाची मंत्रिमंडळाशी तुलना करताना ते म्हणाले, 'शिकविण्यासाठी गेलो तो वर्ग अनुशासित मुलांचा होता. विधानसभा किंवा मंत्रिमंडळामध्ये कशी मुलं आहेत, हे तुम्हालाही माहितीये.'
'राजकारण बाजूला ठेवा'
सनातन संस्थेने नुकत्याच सरकारविषयी जाहीर केलेल्या भूमिकेविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, आजचा दिवस हा शिक्षणासाठी राहू द्या म्हणत फडणवीस यांनी या प्रश्नावर बोलणे टाळले. फडणवीस म्हणाले, 'एखादा दिवस हा शाळेकरीता ठेवा. राजकारण होतच असतं. आजचा दिवस शाळेकरीता, आजचा दिवस 'बेटी पढाव'साठी.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट