अवयव विकण्यासाठीही होईल शेतकऱ्यांची गर्दी
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'सततचा दुष्काळ आणि व्यवस्थेकडून होणारे शोषण यामुळे शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती बिकट आहे. एकीकडे निसर्ग आणि दुसरीकडे व्यवस्था शेतकऱ्यांचा बळी घेत आहे. सध्या त्यांच्याकडे विकण्यासाठीही काही नाही. त्यामुळे शरीराचे अवयव विकण्याची बाजारपेठ निर्माण झाल्यास, शेतकरी त्यांचे अवयव विकण्यासाठी गर्दी करतील, अशी भयानक परिस्थिती सध्या आहे,' असे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी केले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळातर्फे आयोजित शेतकऱ्यांवर आधारित चित्रपटांवरील 'चित्रपटातील बळीराजा- सावकारी पाश ते बारोमास' या चर्चासत्रामध्ये शेट्टी बोलत होते. वात्रटिकाकार रामदास फुटाणे, बारोमास कादंबरीचे लेखक सदानंद देशमुख, चित्रपटाचे निर्माते अरुण कचरे, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रवीकांत तुपकर, दिग्दर्शक धीरज मेश्राम, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आदी या वेळी उपस्थित होते.
'दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस यासारख्या समस्यांमुळे शेतकरी हतबल झाला आहे. राजकारण्यांबरोबरच सामान्य जनताही शेतकऱ्यांचे दुःख समजू शकत नाही. हतबल झालेला शेतकरी आता आत्महत्या करत आहे,' असे शेट्टी म्हणाले. राजकारणी, कलाकार, चित्रकार अशा अनेकांनी देशातील गरिबीचा वापर केला आहे. मात्र, गरिबी दूर करण्यासाठी कोणीही प्रयत्न केला नाही, अशी खंत फुटाणे यांनी व्यक्त केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट