भारतीय जनता पक्षाचे सरकार भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे असून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यापाठोपाठ राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचा नंबर लागणार आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी शुक्रवारी सांगितले. साडेचार हजार कोटी रुपयांचा डाळघोटाळा आणि घरकुल घोटाळ्याची चौकशी व्हावी, यासाठी काँग्रेस पक्ष पाठपुरावा करणार असल्याचे ते म्हणाले. शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेनंतर त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. शहराध्यक्ष रमेश बागवे, उपमहापौर मुकारी अलगुडे, मोहन जोशी, दत्तात्रय गायकवाड या वेळी उपस्थित होते. 'आता अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा नंबर आहे. त्यांनी साडेचार हजार कोटी रुपयांचा डाळ घोटाळा केला असून काही नगरसेवकांना फायदा व्हावा, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने हा गैरव्यवहार झाल्याचा आरोप सावंत यांनी केला. सर्वसामान्य नागरिकांना शंभर रुपये किलो या दराने तूरडाळ देण्याची घोषणा बापट यांनी केली होती. मात्र आजही सर्वसामान्यांना दोनशे रुपये दरानेच डाळ घ्यावी लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो वापरून भाजप सरकारने मेपल ग्रुपच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली आहे. बापट यांच्या आशीर्वादानेच हा घरकुल घोटाळा झाला आहे. या प्रकाराची चौकशी होऊन बापट यांच्यावर कारवाई करावी, यासाठी काँग्रेस आंदोलन करणार आहे' असे सावंत म्हणाले.
'चौकशी विद्यमान न्यायाधीशांनी करावी' एकनाथ खडसे यांची निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्यास काँग्रेसचा विरोध असून विद्यमान न्यायाधीशांमार्फत ही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सावंत यांनी केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट