'जलयुक्त शिवार योजनेत ठेकेदारांची घुसखोरी झाली आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी ठेकेदारांना हद्दपार करण्याची गरज आहे,' असे मत जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले.
ज्ञानप्रबोधिनीचे संस्थापक डॉ. अप्पासाहेब पेंडसे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मंगळवारी डॉ. राजेंद्रसिंह यांना 'भगीरथ पुरस्कार' प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी ज्ञानप्रबोधिनीचे संचालक गिरीश बापट, सुनील जोशी, राम डिंबळे आणि सुभाष देशपांडे उपस्थित होते. 'राज्यात सुरू झालेली जलयुक्त शिवार योजना अत्यंत चांगली आणि लाभदायी आहे. गेल्या वर्षी जलयुक्त शिवार योजना लागू करण्यात आली. या योजनेसाठी शेतकऱ्यांनी स्वतःचे पैसे खर्च करून यशस्वी केली. मात्र, आता या योजनेला ठेकेदारांचे ग्रहण लागले आहे. त्यांना हद्दपार करण्यासाठी आपण सर्वांनी या योजनेत सहभागी होणे गरजेचे आहे. त्याशिवाय ठेकेदारांची घुसखोरी, भ्रष्टाचार थांबणार नाही,' असेही डॉ. राजेंद्रसिंह यांनी स्पष्ट केले.
राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये मी पाहणी केली. समाजाचा सहभाग असलेल्या ठिकाणी योजना यशस्वी झाली आहे. ठेकेदारांनी घुसखोरी केलेल्या ठिकाणी ती अयशस्वी झाली आहे. ठेकेदार कधीही समाजाचा विचार करत नाहीत. ते केवळ स्वतःचा आणि कंपनीचाच विचार करतात, हे आपण लक्षात घेतले पाहिजे, असेही डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले. 'ग्रामीण भागात बंधाऱ्याला दगडगोटे लावून पाणी अडविले जाते. त्याचप्रमाणे शहरातील पावसाचे वाहणारे पाणी अडवून त्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर होणे गरजेचे आहे. पिण्यास अयोग्य असलेले पाणी एकत्रित करून ते शेतीला वापरावे, असा सल्लाही त्यांनी दिला. सुभाष देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. राम डिंबळे यांनी आभार मानले.
----------
'मराठवाड्यात तुरी पेरा'
मराठवाड्यामध्ये पाऊस कमी पडतो. मात्र, तेथे भूगर्भातील पाणी उपसण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुपनलिका काढण्यात आल्या आहेत. दुष्काळ असतानाही ऊसाचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. येथील परिस्थितीचा विचार करता, तुरीसारखी कमी पाण्यावर येणारी आणि वाढणारी पिके घेण्याची गरज आहे, असे डॉ. राजेंद्रसिंह यांनी नमूद केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट