'सरकारच्या हस्तक्षेपामुळेच कांद्यांच्या भावाचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचवायचे असले, तर किमान १५ रुपये प्रति किलो इतका हमीभाव द्यावा आणि मग खुशाल रामराज्य स्थापन करावे,' असा उपरोधिक टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी लगावला आहे. चाकण येथील आंबेठाण चौकात स्वाभिमानी संघटनेतर्फे करण्यात आलेल्या रास्ता रोकोच्या वेळी ते बोलत होते. या वेळी शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शनेही केली. या आंदोलनाच्या वेळी जे. पी. परदेशी, राम गोरे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेट्टी म्हणाले, 'पंधरा दिवसांमध्ये कांद्याचा प्रश्न सुटला नाही, तर कांदा सडून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. स्वामिनाथन समितीची उत्पादनाच्या दीडपट हमीभाव देण्याच्या शिफारशीची अंमलबजावणी सरकारने तातडीने करावी.'
'कांदा प्रश्नांसाठी शेतकऱ्यांना उन्हातान्हात आंदोलन करण्याची वेळ येते, या गोष्टीचे सरकारने आत्मपरीक्षण करावे. शेतकऱ्यांना एक किलो कांद्यासाठी १३ रुपये इतका उत्पादन खर्च येतो. पण सध्या कांद्याला दीड ते सहा रुपये इतकाच भाव मिळतो. त्यामुळे हा खड्डा कसा काय भरून काढणार? ही शेतकऱ्यांची समस्या आहे. मात्र, आपले केंद्र सरकार शत्रूराष्ट्र पाकिस्तानकडून कांदा खरेदी करते आहे. मल्ल्यांसारख्या कर्जबुडव्यांवर कारवाई होत नाही. बँकांना पंचवीस हजार कोटींची मदत दिली जाते, उद्योजकांसाठी कर्ज आणि करसवलती मिळतात. पण गरीब शेतकऱ्यांच्या हाती काहीही मिळत नाही,' अशी टीकाही शेट्टी यांनी केली.
...
राज्यातील आणि केंद्रातील आघाडी सरकारे पाडण्यात आमचा खारीचा वाटा होता. सरकार बदलल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत. सरकारच्या सांगण्यात आणि करण्यात फरक आहे. त्यामुळे आता सरकारशी दोन हात करण्याची वेळ आली तरी चालेल, पण आम्ही मागे हटणार नाही. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी सरकारवर दरारा निर्माण केला जाईल.
- राजू शेट्टी, खासदार
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट