मयुरेश प्रभुणे, पुणे
पावसाकडे चातकासारखी नजर लावून बसलेल्या देशवासीयांसाठी खूशखबर असून, मान्सून २३ मेच्या आसपास केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू असून, त्याच्या प्रभावामुळे मान्सून सर्वसाधारण तारखेच्या आठवडाभर आधीच केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर एक जूनपर्यंत दक्षिण भारत आणि सबंध पश्चिम किनारपट्टीवर चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुण्यातील इंडियन 'इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी'च्या (आयआयटीएम) 'क्लायमेट फोरकास्ट सिस्टीम मॉडेल व्हर्जन टू'च्या (सीएफएस व्ही २) आगामी २० दिवसांच्या अंदाजामधून मान्सूनच्या केरळमधील आगमनाचे शुभसंकेत देण्यात आले आहेत. मान्सून १७ मेच्या आसपास अंदमानमध्ये दाखल होण्याचा अंदाज 'आयआयटीएम'ने आधी वर्तवला होता. त्या अंदाजावर भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शुक्रवारी शिक्कामोर्तब केले आणि पुढील तीन दिवसांत मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल होणार असल्याचे सांगितले. 'आयआयटीएम'च्या नव्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असून, ते तमिळनाडूकडे सरकणार आहे. चक्रीवादळामुळे दक्षिण भारतात १७ मेपासून पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा प्रभाव कमी होत असताना २३ मेपासून केरळ आणि कर्नाटकवरून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाह सुरळीत होणार असून, त्यांच्यासोबत दक्षिण भारतात मान्सूनचे आगमन होईल.
उच्चपदस्थ सूत्रांकडून महाराष्ट्र टाइम्सला मिळालेल्या माहितीनुसार, यंदा मान्सून आठवडाभर आधीच केरळमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता असून, अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही बाजूंनी मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे चक्रीवादळ भारताकडे सरकण्याची शक्यता असल्यामुळे मान्सूनच्या प्रगतीत अडथळा न होता, उलट त्याची वाटचाल वेगाने होईल. मान्सूनचा केरळनंतरचा प्रवासही त्याच्या सर्वसाधारण वेळेआधीच होण्याची शक्यता 'आयआयटीएम'च्या मॉडेलमधून दिसून येत आहे. त्यामुळे दुष्काळाशी लढणाऱ्या महाराष्ट्रामध्येही मान्सून वेळेआधीच दाखल होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
............
पुढील तीन दिवसांत अंदमानमध्ये
हिंदी महासागरात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होत असून, पुढील तीन दिवसांत मान्सून निकोबारमध्ये आणि दक्षिण अंदमानच्या समुद्रात दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शुक्रवारी जाहीर केला. श्रीलंकेजवळ बंगालच्या उपसागरात चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, पुढील दोन दिवसांत तिची तीव्रता वाढत जाऊन अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) निर्माण होण्याची शक्यता आहे. या स्थितीमुळे मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण निर्माण होत असून, पुढील तीन दिवसांत मान्सून दक्षिण अंदमानच्या समुद्रात आणि निकोबार बेटांवर दाखल होईल, असे 'आयएमडी'ने अंदाजात म्हटले आहे.
................
केरळमध्ये लवकर, मुंबईत उशिरा
नवी दिल्ली : केरळात २८ ते ३० मेच्या दरम्यान, म्हणजेच नेहमीपेक्षा दोन ते तीन दिवस आधीच मान्सूनचे आगमन होणार असल्याचे भाकीत 'स्कायमेट' या वेधशाळेने वर्तवले आहे. तिथून पुढे सरकत मुंबईत हा मान्सून पोहोचण्यास मात्र १२ जूनची तारीख उजाडणार आहे, असे 'स्कायमेट'ने म्हटले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट