प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला इशारा
म. टा. प्रतिनिधी, पुणे
'महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सध्या अस्तित्वात असणारी एकसदस्यीय (सिंगल) वॉर्ड पद्धत बदलून बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू केल्यास त्याविरोधात आपण पुन्हा कोर्टात जाऊ,' असा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी दिला. त्यामुळे राज्य सरकारच्या संभाव्य निर्णयावर कायद्याच्या लढाईची टांगती तलवार उभी राहण्याची शक्यता आहे.
राज्यातील महापालिकांमध्ये यापूर्वी बहुसदस्य प्रभाग पद्धतीने निवडणुका घेण्यात आल्या. मात्र, ही पद्धत अन्यायकारक असल्याची भूमिका घेऊन आंबेडकर यांनी कोर्टात दाद मागितली होती. या प्रकरणी सरकारच्या वतीने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आणि त्यानुसार विधिमंडळात कायदा बदलून एकसदस्यीय पद्धतीने निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या पार्श्वभूमीवर बहुसदस्य पद्धत लागू केल्यास निवडणुकीत फायदा होईल, असा मतप्रवाह सत्ताधारी भारतीय जनता पक्षात मूळ धरू लागल्याने पुन्हा चार सदस्यांचा प्रभाग करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरू झाल्या आहेत. परंतु, तसे सरकारला करता येणार नाही. तसा निर्णय घेतला, तर आपण कोर्टात जाऊ, असा इशारा आंबेडकर यांनी 'मटा'शी बोलताना दिला.
दरम्यान, भाजप वगळता अन्य काही पक्ष, विशेषतः छोट्या पक्षांमधून या पद्धतीच्या निवडणुकांमध्ये आपले अस्तित्व संपण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच, मुख्य प्रवाहातील पक्षांमधील सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही या पद्धतीमध्ये संधी मिळणार नाही, अशीही भीती व्यक्त होत आहे. या परिस्थितीत सरकार कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आगामी महापालिकेची निवडणूक वॉर्ड पद्धतीने होणार, की प्रभाग स्तरावर याबद्दल चर्चा सुरू होती. गेल्यावर्षी कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुका वॉर्ड पद्धतीने झाल्या होत्या. त्यामुळे, आगामी वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या दहा महापालिकांच्या निवडणुकाही त्याच पद्धतीने होतील, अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र, या महापालिकांमध्ये सत्ता मिळविण्यासाठी आतूर झालेल्या भारतीय जनता पक्षाने वॉर्डऐवजी प्रभाग पद्धतीनेच निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
प्रामुख्याने शहरी भागांत होणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची कमी झालेली ताकद, मनसेचा घटलेला करिष्मा आणि मुंबई-ठाणे हा पट्टा वगळता इतर ठिकाणी शिवसेनेच्या मर्यादा ओळखून प्रभाग पद्धतीने झालेली निवडणूक अधिक फायदेशीर ठरेल, असा कयास भाजपमधील जाणकारांनी वर्तविला. त्यातही, सध्याच्या दोन सदस्यीच प्रभागाऐवजी चार सदस्यांचा एक प्रभाग झाल्यास, भारतीय जनता पक्षाला त्याचा सर्वाधिक फायदा होऊ शकतो, अशी शक्यताही वर्तविण्यात आली. त्यासाठी, २००२ मध्ये झालेल्या निवडणुकीचे दाखलेही अनेकांनी दिले. त्यामुळे, चार सदस्यांचा प्रभाग करून आगामी महापालिका निवडणुका लढविण्यावर पक्षात जवळपास एकमत झाले आहे.
..
लवकरच घोषणा होणार
भाजपप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही प्रभाग पद्धतीला अनुकूल असून, काँग्रेस आणि शिवसेनेचा तीव्र विरोध कमी करण्यातही भाजप नेतृत्वाला यश लाभले आहे. प्रभागांची रचना, त्यासाठीचे आरक्षण अशी सर्व प्रक्रिया जुलै-ऑगस्टपर्यंत पूर्ण होणे गरजेचे असल्याने आगामी काही दिवसांमध्येच चार सदस्यांच्या प्रभागाबद्दलची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. सध्या पुण्यासारख्या शहरात दोन सदस्यांच्या एका प्रभागाची लोकसंख्या सरासरी ३० हजार ते ३५ हजारांच्या दरम्यान आहे. यामध्ये, काही प्रभाग ४० ते ५० हजार लोकसंख्येचेही आहेत. त्यामुळे, आता चार सदस्यांचा प्रभाग होताना लोकसंख्येसह प्रभागाचे क्षेत्रफळही वाढणार आहे. परिणामी, संपूर्ण प्रभागापर्यंत पोहोचण्यासाठी त्याची घोषणा लवकरात लवकर केली जावी, असा आग्रह इच्छुकांकडून धरला जात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट