म. टा. प्रतिनिधी, येरवडा
नगर रोड बीआरटी मार्गावरील अपूर्ण कामे लवकर पूर्ण करावीत, सुरक्षासुविधा पुरवाव्यात, विमा संरक्षण द्यावे आदी मागण्यांसाठी वडगाव शेरी नागरिक मंचाने नगर रोडवरील हयात चौकात आंदोलन केले. नगर रोड बीआरटी मार्गाचे घाईगडबडीत उद्घाटन केल्यानंतर पालिकेकडून अर्धवट अवस्थेतील कामे पूर्ण करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रवाशांच्या सुरक्षेची पुरेसे काळजी न घेता केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बीआरटी सुरू करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांसाठी पुरेसे पूल, भुयारी मार्ग नसल्याने पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो आहे. त्यामुळे या रस्त्यावर गेले तीन चार दिवस सतत अपघाताच्या घटना घडत आहेत.
बीआरटी मार्गातील प्रत्येक चौकात वार्डन नियुक्त करावेत, आवश्यक ठिकाणी गतिरोधक बसवण्यात यावेत, झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे आखण्यात यावेत, बसस्थानकावरील स्वयंचलित दरवाज वेळेवर उघडण्यासाठी आणि बंद होण्याची सुविधा व्यवस्थित कार्यरत असावी, बीआरटी मार्गावरील सिग्नलसाठीची निविदा काढण्याच्या कामाला गती द्यावी आदी मागण्या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. बीआरटी मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विमाकवच देण्याची आग्रही मागणीही करण्यात आली आहे. या वेळी मंचाचे अध्यक्ष आशिष माने, प्रमोद देवकर, संदीप दहिफळे, सहित बनकर, फिरोज मणियार, सचिन पठारे, अनिल जावळकर, बाळा पऱ्हाड, राजू शिरसाठ, प्रदीप रोकडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनाची जागा बदलली
नगररोड बीआरटीवरील कामे अपूर्ण असतानाही बीआरटी मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वडगाव शेरी नागरिक मंचाने बीआरटी मार्ग रोखण्याचे नियोजन केले होते. त्याबाबत पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय पाटील यांनी बीआरटी मार्गात आंदोलन करता येणार नाही. तसे आंदोलन केल्यास आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे आंदोलकांना स्पष्ट केले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलनाची जागा बदलली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट