म. टा. प्रतिनिधी, पिंपरी विनापरवाना चिटफंड चालवित असल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी छापा टाकून गुन्हा दाखल केलेल्या वृद्ध दाम्पत्यातील पत्नीचा हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी (२४ एप्रिल) सकाळी मृत्यू झाला. परंतु, पिंपरी कॅम्पमधील सर्व व्यापाऱ्यांनी पिंपरी पोलिसांच्या जाचामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत रविवारी बंद पाळण्याचा प्रयत्न केला. त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. तसेच, दोषी पोलिसांवर मंगळवारपर्यंत कठोर कारवाई न केल्यास बेमुदत बंदचा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे. सुनीता रामचंद्र नाथानी (वय ५८, रा. धनराज कॉम्प्लेक्स, अशोक थिएटरजवळ, पिंपरी) असे मृत्युमुखी पडलेल्या वृद्धेचे नाव आहे. पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी सुनीता यांच्यासह त्यांचे पती रामचंद्र रेणुमल नाथानी (६४) यांच्याविरुद्ध विनापरवाना चिटफंड भिशी चालवित असल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता. आरोपी नाथानी दाम्पत्य हे विनापरवाना 'टिना एंटरप्रायजेस' या नावाने सभासदांकडून ३०० व ५०० रुपये घेवून ड्रॉद्वारे चिटफंड भिशी चालवत असल्याची माहिती पिंपरी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत त्यांच्याकडून ७ लाख ४३ हजार ५०० रुपयांची रोकड व इतर साहित्यही जप्त करण्यात आले. चौकशीनंतर नोटीस बजावून सुनीता नाथानी यांना सोडून देण्यात आले होते. परंतु, काही वेळाने सुनीता नाथानी यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांना थेरगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र, रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. यामुळे पिंपरी कॅम्पमधील सेंट्रल पंचायत या संघटनेने याचा निषेध नोंदवित बंद पाळण्याचे आवाहन केले. त्याला व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला. यासंदर्भात संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, 'पिंपरी पोलिसांनी कोणाचीही तक्रार नसताना कारवाई कशी केली ? पोलिस पथकात महिला पोलिसांचा सहभाग नसताना घरात एकट्या असणाऱ्या वृद्ध महिलेला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात का नेले ? सुनीता नाथानी यांना कोणतीही माहिती न देता, नोटीस न बजावता किंवा वॉरंट न काढता ताब्यात का घेतले ? पोलिसांच्या जाचामुळेच सुनीता यांना मानसिक धक्का बसला. त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला,'असा आरोप संघटनेने केला आहे. संघटनेने पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनाही निवेदन दिले आहे. दोषी पोलिसांवर मंगळवारपर्यंत कारवाई न केल्यास बेमुदत बंद पाळण्याचा इशाराही संघटनेचे अध्यक्ष शिवनदास पामनानी यांनी दिला आहे. दरम्यान, 'मृत वृद्ध महिलेला पोलिसांनी कोणताही जाच दिला नाही. तसेच, महिलेला अटकही केली नव्हती. कायदेशीर नोटीस देऊन सोडून दिले होते. संबंधित महिला पूर्वीपासून आजारी होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा हृदयविकाराचा झटका येऊन महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यात पोलिसांचा कोणताही दोष नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. या भिशी प्रकरणात सुमारे ७०० लोक सभासद असून गेल्या २५ वर्षांपासून बेकायदा ही भिशी चालू आहे. तसेच त्यामध्ये मोठ्या व्यावसायिक व नेत्यांचा हात असून महिलेचा आजारपणात मृत्यू झाला असतानाही पोलिसांवर दबाव आणला जात असून, तपासावर त्याचा परिणाम होण्यासाठी राजकीय लोक पोलिसांनाच वेठीस धरत असल्याचे बोलले जात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट