मालवणी, नागपुरी, कोल्हापुरी, वऱ्हाडी चवीची हॉटेल्स उपलब्ध
पुणे : पुण्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या सदाशिव पेठेतील सर्वाधिक चर्चेची गोष्ट म्हणजे नॉनव्हेज जेवणासाठी प्रसिद्ध असलेली टिळक स्मारकासमोरची गल्ली. अस्सल पुणेरी, कोल्हापुरी, गावरान, वऱ्हाडी, नागपुरी आणि मालवणी स्वादाच्या पदार्थांचा आनंद लुटण्यासाठी खवय्ये इथे आवर्जून येतात. पूर्वीच्या तुलनेत खाण्याच्या ठिकाणांमध्ये बरीचशी वाढ झाली असली, तरीही 'स्वाद, स्वच्छता आणि सेवा' या तीन गोष्टी ज्यांना जमल्या, तेच इथे टिकले. बाकीच्यांची डाळ (खरे तर मटण-चिकन) इथे शिजले नाही, अशीच परिस्थिती आहे.
वऱ्हाडी, सावजी स्वादाचे 'हॉटेल नागपूर', अस्सल गावरान चवीचे 'गोपी' आणि पुणेकरांच्या पसंतीची चव डेव्हलप करणारे 'आशीर्वाद' ही या खाऊ गल्लीतील आद्य केंद्रे. शंभरहून अधिक वर्षांची परंपरा असलेले 'आवारे' या गल्लीमध्ये नसले, तरी शेवटी तो याच गल्लीचा विस्तारित भाग. आणि मु. पो. सदाशिव पेठच. नंतरच्या काळात ही खाऊगल्ली अधिक बहरत गेली आणि आणखी नावारूपास आली. 'कोल्हापूर मराठा दरबार', 'पुरेपूर कोल्हापूर', 'शांभवी कोल्हापूर दरबार' आणि 'सुगरन्स कोल्हापुरी नॉनव्हेज' या कोल्हापुरी तांबड्या-पांढऱ्या रस्स्यानं सदाशिव पेठेचे मार्केट खाऊन टाकले. (खरे तर पिऊन टाकले.) विद्यार्थी वर्ग आणि चाकरमान्यांच्या पसंतीस पडलेली 'मिलन खानावळ'ही इथे भलतीच लोकप्रिय ठरली.
अर्थात, 'स्वाद, स्वच्छता आणि सेवा' हाच इथल्या लोकप्रियतेचा मूलमंत्र राहिला आहे. हे समीकरण ज्याला जमलं नाही, त्यांना इथे रुळता आले नाही. 'मालवणचं कालवण' किंवा 'कोल्हापुरी रस्सा मंडळ' असो, 'सावजी', 'सृष्टी' असो किंवा 'कोळीवाडा'. ही हॉटेल्स सुरू झाली आणि पुरेशी चर्चेत येण्यापूर्वीच बंद पडली. त्यांची जागा आता 'बिर्याणी मास्टर', 'पूनम खाणावळ' आणि 'रस्सा जस्सा हवा तस्सा' या पाट्यांनी व्यापली आहे. 'रस्सा'ने महाराष्ट्रातील चार-पाच ठिकाणचे स्वाद एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अशा पद्धतीने नावीन्यपू्र्ण काहीतरी देण्याची व्यवस्थाही करावी लागते. सर्वच जणांना पारंपरिक 'मेन्यू' आणि एकाच प्रकारच्या स्वादावर अवलंबून राहता येत नाही.
हे झाले भौतिक बदल. पण अनेक बदलांना या खाऊगल्लीला सामोरे जावे लागले आहे. पूर्वीच्या तुलनेत स्पर्धा अधिक वाढली आहे. स्पर्धा वाढली म्हणजे दराच्या बाबतीत अनेकदा तडजोड करावी लागते. तुलनेने नवीन असलेली हॉटेल्स आपले बस्तान बसविण्यासाठी कमी दरांमध्ये खाद्यपदार्थ 'सर्व्ह' करतात. इतरांना त्यांच्याशी स्पर्धा करावी लागते. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी काही हॉटेल्स मुद्दाम कमी दरामध्ये पदार्थ उपलब्ध करून देतात. मग ते विद्यार्थी त्यांच्याकडेच जातात. सदाशिव पेठ आणि परिसरात विद्यार्थी हा मोठा ग्राहक वर्ग निर्माण झाला आहे. त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करून चालत नाही. शिवाय, ग्राहकांच्या मागणीनुसार 'मेन्यू कार्ड'मध्ये काही पदार्थांचे अॅडिशन करावे लागते. 'आम्ही हे सर्व्ह करीत नाही,' असा स्पष्टवक्तेपणा इथे चालत नाही.
हल्ली काळ बदलला आहे. हॉटेल्स ही 'माउथ पब्लिसिटी' आणि 'सोशल नेटवर्किंग साइट्स' तसेच खाण्यापिण्याच्या वेबसाइटवरील प्रतिक्रिया यांच्यामुळे अधिक लोकप्रिय होतात. त्यामुळे पदार्थांची नुसती चव चांगली असून भागत नाही. स्वच्छता, टापटीप, वेटर मंडळींचे कपडे, त्यांचे वागणे-बोलणे आदी गोष्टीही खूप महत्त्वाच्या ठरतात. तुमच्याकडून झालेली छोटी चूक सोशल मीडियावर गेली, तर तुमच्या प्रतिमेला तडा जाऊ शकतो. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो.
...........
'हल्लीच्या काळात भेडसावणारी आणि ग्राहकांना येण्यापासून रोखणारी आणखी एक महत्त्वाची समस्या म्हणजे पार्किंग. सहकुटुंब येणाऱ्या ग्राहकांना कार पार्किंगसाठी जागा नाही. त्यामुळे पूर्वी औंध, सिंहगड रोड किंवा सातारा रोडहून येणारे खवय्ये आता आमच्या इथे येणे टाळतात. त्यांना त्यांच्या परिसरात कोल्हापुरी किंवा मालवणीचे विविध पर्याय उपलब्ध निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यांना सदाशिव पेठेतील खाऊगल्लीत यावेच लागते, असे नाही. अर्थात, अनेक खवय्ये या समस्यांवर उपाय शोधून आमच्याकडे येतात.'
- अभिमन्यू पोटे, 'शांभवी कोल्हापूर दरबार'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट