म. टा. प्रतिनिधी, पुणे
डाळींची आयात केल्यानंतर तसेच, विविध पक्षांनी आपल्या डाळविक्री करूनही सहा महिन्यांतच पुन्हा राज्यापुढे डाळसंकट उभे ठाकले आहे. उत्पादन घटल्यामुळे तूर डाळीचे दर वाढू लागले असून, लवकरच किलोमागे दीडशे रुपयांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. या समस्येवर मात करण्यासाठी राज्य सरकार काय पावले उचलते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
गेल्या वर्षी तूर डाळीने किलोमागे दोनशे रुपयांचा टप्पा ओलांडल्यानंतर राज्य सरकारला जाग आली. त्यानंतर खासगी कंपनीकडून खरेदी केलेली तूरडाळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी १०० रुपये किलो दराने विकली. आता डाळीची दीडशे रुपयांकडे वाटचाल सुरू केल्याने राज्यात पुन्हा डाळीच्या दरवाढीचे संकट ओढावण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या वर्षी पावसाने ओढ दिल्याने राज्यासह परराज्यातही तूर डाळीचे उत्पादन घटले होते. तुटवड्यामुळे किरकोळ बाजारात दोनशे रुपये दराने तूरडाळ खरेदी करण्याची वेळ आली होती. विरोधी पक्षाने या विरोधात आवाज उठवला होता. नंतर विरोधकांच्या सूरात शिवसेनेने आपलाही सूर मिसळला. या पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी १०० रुपयांत किलोभर तूरडाळ उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती.
अखेर ठाण्यातील बड्या व्यापाऱ्याची जप्त केलेली डाळ खरेदी करून १०० रुपये किलो दराने भाजपतर्फे पुण्यात विकण्यात आली. ब्रह्मदेशासह अन्य देशांतून तूरडाळ आयात करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत होते. डिसेंबर महिन्यात राज्यातील विविध भागातून तूरडाळ बाजारात आल्याने दर उतरले. गेल्या महिन्याभरात क्विंटलमागे तूरडाळीत १२०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे घाऊक बाजारात १३८ ते १४० रुपये तर, किरकोळ बाजारात १५० रुपये किलो दराने तूरडाळ विकली जात आहे.
सध्या उपलब्ध असलेला डाळींचा साठा अल्प आहे. जूननंतर नव्याने डाळींची पेरणी होईल. त्याचे उत्पादन डिसेंबरमध्ये हाती येईल. तोपर्यंत सध्या उपलब्ध असलेल्या तूरडाळीवर अवलंबून राहावे लागणार आहे. दर आवाक्यात राहावेत या साठी तूर डाळ आयात करण्याशिवाय पर्याय नाही. तूर डाळीने दोनशे रुपयांचा टप्पा ओलांडल्यास स्वयंपाकघरातून ती पुन्हा हद्दपार होण्याची शक्यता आहे.
डिसेंबर महिन्यात नवी तूर डाळ हाती येईल. तोपर्यंत राज्यात पुरेल एवढा डाळीचा साठा उपलब्ध नाही.
.......
सध्या लातूर, बीड, बिदर, बार्शी, अकोला येथील बहुतांश डाळमिल बंद आहेत. तूर डाळीचे उत्पादन घेणाऱ्या मिलकडून साठेबाजी होण्याचा धोका ओळखून त्यांना कर्जपुरवठा करण्यास बँकांना राज्य सरकारने मनाई केली. मिल बंद झाल्याने तूर डाळीचा तुटवडा निर्माण झाला आहे.
एक घाऊक विक्रेता
...
किरकोळ बाजारात आताच तूर डाळीचा तुटवडा जाणवत आहे. बाजारात पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यास महिन्याभरात डाळ दीडशे रुपयांचा टप्पा ओलांडेल.
नितीन नहार, डाळीचे व्यापारी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट