'भारत माता की जय, वंदे मातरम, जयहिंद केवळ या घोषणा देणे म्हणजे, राष्ट्रवाद किंवा देशभक्ती नाही. घोषणा जरुर द्या. पण, दुष्काळी भागात जाऊन तेथील लोकांची सेवाही करा. दुष्काळामुळे संपूर्ण देशाचा अन्नदाता शेतकरी संकटात सापडला आहे. अन्नदात्याला जगवणे हा खरा राष्ट्रवाद असून, हीच खरी देशभक्ती आहे,' असे मत ज्येष्ठ राजकीय व सामाजिक विश्लेषक योगेंद्र यादव यांनी सोमवारी व्यक्त केले.
पुणे श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक ज. स. करंदीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यादव यांचे 'महाराष्ट्रातील दुष्काळ' या विषयावर व्याख्यान आयोजिण्यात आले होते. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, सरचिटणीस योगिराज प्रभुणे उपस्थित होते. या वेळी 'कविवर्य भालचंद्र खांडेकर स्मृती उत्कृष्ट मुद्रितशोधक पुरस्कार' यादव यांच्या हस्ते पुरुषोत्तम काळे यांना प्रदान करण्यात आला.
'गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रवाद व देशभक्तीची जोरदार चर्चा सुरू आहे. भारत माता की जय, वंद मातरम किंवा जयहिंद म्हणणारेच देशभक्त आहेत, असे नाही. केवळ या घोषणा देऊन स्वतःवर राष्ट्रवादाचा शिक्का मारून घेणाऱ्यांनी दुष्काळग्रस्त भागात जावे. तेथील शेतकऱ्यांसाठी काम करावे. हे राष्ट्रवादी गोहत्यांविरोधात लढतात. मात्र, दुष्काळामुळे जनावरांवर मृत्यूचे सावट आहे, त्याकडे कोणाचे लक्ष जात नाही,' अशी खंतही यादव यांनी व्यक्त केली. मराठवाडा दुष्काळात होरपळला असताना देखील तेथील शेतकरी उसाचे पीक घेतात. जास्त पाणी लागणारी पिके या काळात घेणे योग्य नाही. तसेच, साखर कारखान्यांचा गाळप हंगामही उशिरा सुरू करावा आणि मद्यनिर्मिती उद्योग काही महिने बंद ठेवावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली असल्याचे यादव यांनी सांगितले.
'राज्यात मनरेगा अपयशी'
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) राबविण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरल्याची टीका यादव यांनी केली.राज्यातील २१ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील सहा हजार ३५२ गावांमध्ये मनरेगा योजनेअंतर्गत एकही काम करण्यात आलेले नाही. तसेच, पुणे जिल्ह्यातील एक हजार ४०४ ग्रामपंचायतींपैकी ९५४ ग्रामपंचायतीत एकही काम करण्यात आले नाही. सरकार या योजनेसाठी निधी देत नाही, असे यादव म्हणाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट