@timesgroup.com
पुणे : पुणे लोहमार्ग पोलिस विभागाची हद्द सुमारे तेराशे किलोमीटर लांबीची असताना त्यांच्याकडे फक्त साडेआठशे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यामुळे रेल्वे मार्गावर होणारे गुन्हे रोखण्यासाठी मनुष्यबळ खूपच कमी पडत आहे. तसेच, पुणे लोहमार्ग विभागात येणाऱ्या आठ जिल्ह्यांसाठी सध्या फक्त सहाच पोलिस ठाणी असल्यामुळे नवीन सहा रेल्वे पोलिस ठाणी देण्याचा प्रस्ताव लोहमार्ग पोलिसांनी सरकारला पाठवला आहे.
पुणे लोहमार्ग विभागाची हद्द मोठी असून ती पुणे, सोलापूर, लातूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर या आठ जिल्ह्यांतून जाते. सध्या पुणे रेल्वे विभागामध्ये सहा पोलिस ठाणी आहेत. त्यासाठी आठशे कर्मचारी व ४० अधिकारी आहेत. मनुष्यबळाची कमतरतेमुळे रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी बंदोबस्त करताना रेल्वे पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे. पोलिस ठाण्याचे अंतर खूप असल्याने गुन्हा घडल्यानंतर घटनास्थळी पोहचण्यासाठी उशीर लागतो. त्यामुळे पुणे लोहमार्ग पोलिस विभागाकडून नवीन सहा रेल्वे पोलिस ठाणी मिळावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
पुणे ते सोलापूर दरम्यान रेल्वेमधील प्रवाशांना लुटण्याचे अनेक प्रकार घडतात. सिग्नलला थांबलेल्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यामधील प्रवाशांचे साहित्य खिडकीतून चोरले जाते. त्या ठिकाणी रेल्वे पोलिसांकडून मनुष्यबळ लावले जाते. पुणे ते सोलापूर दरम्यान रेल्वेत प्रवाशांची लूट होणारी शंभरपेक्षा जास्त ठिकाणे आढळून आली आहेत. मात्र, मनुष्यबळाअभावी यापैकी निम्म्याच ठिकाणी पोलिस तैनात करणे शक्य झाले आहे. सध्या सुरू असलेल्या भरतीमध्ये रेल्वे पोलिसांसाठी १९ जागा दिल्या आहेत.
याबाबत लोहमार्ग विभागाचे अधीक्षक विश्व पानसरे म्हणाले, 'लोहमार्ग पोलिसांना मनुष्यबळाची आवश्यकता असल्यामुळे सरकारकडे त्याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. सध्या सहा पोलिस ठाणी असून नवीन सहा पोलिस ठाणी मिळावीत, अशी मागणी प्रस्तावामध्ये केली आहे.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट