नोकरी आणि शिक्षणानिमित्त पुण्यात स्थायिक झालेले कोकणवासीय आणि पर्यटकांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने होळीनिमित्त ८० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. स्वारगेट, शिवाजीनगर व पुणे स्टेशन येथून येत्या बुधवारपर्यंत या गाड्या सोडल्या जाणार आहेत.
गणेशोत्सवाबरोबरच कोकण होळी सणासाठीही प्रसिद्ध आहे. विविध कारणास्तव कोकण सोडून अन्य शहारत झालेले नागरिक या सणासाठी न चूकता परतत असतात. येथील होळी पाहण्यासाठी पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढते. अपुऱ्या प्रवासी साधनांमुळे प्रवाशांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी एसटीकडून दर वर्षी जादा गाड्या सोडल्या जातात. पुण्यातून रत्नागिरी, खेड, चिपळून, गुहागर आणि दापोली आदी ठिकाणांसाठी या जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
गेल्या चार दिवसांपासून या ८० गाड्या ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापैकी बहुतांश गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. मात्र, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या मागणीनुसार आणखी गाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच, सण संपल्यानंतर परतणाऱ्या प्रवाशांसाठी जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले असल्याचे असल्याचे विभागीय नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी सांगितले.
'कोकणाबरोबरच सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक आणि औरंगाबादला होळी सणासाठी एसटीतर्फे जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. त्यामुळे या सर्व मार्गांसाठी आरक्षणाव्यतिरिक्त शंभर गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, अधिक गाड्यांची गरज भासल्यास त्याची व्यवस्था केली जाणार आहे,' असेही त्यांनी सांगितले.
..
'स्वारगेट ते बोरिवली नव्या फेऱ्या
मुंबईला जाणाऱ्या वाढत्या प्रवाशांची संख्या लक्षात घेत, राज्य मार्ग पहिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाने स्वारगेट ते बोरिवली या मार्गावर आता प्रत्येक अर्ध्या तासाला शिवनेरी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. उन्हाळ्याची सुटीमुळे प्रवाशांची वाढती संख्या, परिणामी बसेसची वाढती मागणी या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेला आहे. स्वारगेट-बोरीवली दरम्यान प्रत्येकी १७ नवीन फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. यापूर्वी देखील १७ फेऱ्या होत होत्या. त्यामुळे यापुढे एकूण ३४ फेऱ्या होणार आहेत,' अशी माहिती एसटीचे पुणे विभागाचे नियंत्रक शैलेश चव्हाण यांनी दिली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट