म. टा. प्रतिनिधी, पुणे
फुरसुंगी आणि शेवाळेवाडी परिसरातील पाणीप्रश्न कायमचा सोडविण्यासाठी नदीसुधार योजनेअंतर्गत ८०० कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आली असून, या भागात जुना मुळा-मुठा कालव्यातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याची चौकशी करण्याचे आश्वासन राज्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले.
मुंढवा जॅकवेलमधील पाणी जुना मुळा-मुठा कालव्यातून सुरू करण्यात आले आहे. हे पाणी दूषित असून त्याला दुर्गंधी येते. याची चौकशी करण्याची आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांनी केली होती. त्यावेळी डॉ. पाटील यांनी विधान परिषदेत हे आश्वासन दिले.
'मुंढवा जॅकवेलमधून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे या परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. पुणे महापालिकेने मलशुद्धीकरण प्रकल्पाद्वारे (एसटीपी) शुद्ध पाणीपुरवठा करणे आवश्यक असताना, बीओटी तत्त्वावर दिलेल्या 'एसटीपी' प्रकल्पांमध्ये शंभर टक्के शुद्ध पाणी करण्यात येत नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करावी; तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे,' असे आमदार भोसले म्हणाले.
डॉ. पाटील म्हणाले, 'शेवाळेवाडीला टँकरने पाणी पुरवठा केला जातो, तर फुरसुंगीला नळांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. या परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी नदीसुधार योजनेअंतर्गत ८०० कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आली आहे. लवकरच ही योजना सुरू होईल.'
या चर्चेत भाग घेताना आमदार सुनिल तटकरे यांनी पर्यावरण विभाग काय कारवाई करणार, असा सवाल केला. त्यावर पर्यावरणमंत्री रामदास कदम म्हणाले, 'या भागातील पाण्याचे नमुने घेऊन त्याची पुन्हा तपासणी करण्यात येईल. त्यानंतर आठवडाभरात कार्यवाही होईल.'
या चर्चेत आमदार जयंत पाटील, शरद रणपिसे, धनंजय गाडगीळ, हेमंत टकले यांनी सहभाग घेतला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट