म. टा. प्रतिनिधी, पुणे अपघात टाळण्यासाठी हेल्मेट सक्ती करण्यापेक्षा आधी रस्ते सुधारण्यावर भर द्या, पुणेकरांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून द्या आणि सिग्नलची दुरुस्ती करा. हेल्मेट वापराबाबत जनजागृती करा; परंतु हेल्मेट सक्ती करून पुणेकरांना वेठीस धरू नका, असे इशारा हेल्मेट सक्ती विरोधात सर्व पक्षीयांनी केले. पुणेकरांवर लादलेल्या हेल्मेट सक्ती विरोधात शनिवारी सर्वपक्षीय आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी महात्मा फुले मंडईत लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले. महापौर दत्तात्रय धनकवडे, आमदार मेधा कुलकर्णी, शिवसेनेचे शहर प्रमुख विनायक निम्हण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस संदीप खर्डेकर, शिवसेनेचे शहर संघटक श्याम देशपांडे, नगरसेवक दीपक मानकर, प्रशांत बधे, रुपाली पाटील- ठोंबरे, धनंजय जाधव, समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाठक, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब रुणवाल आदी या वेळी उपस्थित होते. 'रद्द करा, रद्द करा हेल्मेट सक्ती रद्द करा', अशा जोरदार घोषणा या वेळी देण्यात आल्या. 'काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या काळातही हेल्मेट सक्ती विरोधात आंदोलन करण्यात आले होते. तेव्हा पुण्यातील सर्व आमदारांनी विधानसभेत आवाज उठविला. परिणामी, हेल्मेट सक्ती मागे घेण्यात आली होती. सध्या शहरात भाजपचे आमदार आणि खासदार आहेत. त्यांनी पुणेकरांची भावना मांडायला हवी,' अशी अपेक्षा महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी व्यक्त केली. 'अपघातापासून बचाव होण्यासाठी हेल्मेट सक्ती केली आहे. मात्र, अपघात होण्याच्या कारणांकडे दुर्लक्ष कररण्यात आले. दारू पिऊन वाहन चालविल्याने, रस्ते खराब असल्याने अपघात होतात,' असे काकडे म्हणाले. वाढत्या अपघातांमुळे हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र, अपघातांचे मुख्य कारण काय आहे, हे शोधण्याचा सरकारने प्रयत्न केला नाही. सध्या ४० टक्के अपघात वाहन चालविताना मोबाइलच्या करण्यात येणाऱ्या वापरामुळे होतात, असे मत मानकर यांनी व्यक्त केले. 'हेल्मेट सक्ती मागे घ्यावी' मोटार वाहन कायद्यातील कलम २५० प्रमाणे महापालिका हद्दीत हेल्मेट सक्ती लागू करायची किंवा नाही, याबाबत संबंधित हस्तक्षेप करण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या भावनांचा आदर करून, राज्य सरकारने या हेल्मेट सक्तीमध्ये हस्तक्षेप करावा, अशी मागणी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शिवा मंत्री यांनी केली. ------- मी नेहमीच हेल्मेट वापराबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र, नागरिकांना हेल्मेट वापराताना उदभवणाऱ्या अडचणी सोडविणे गरजेचे आहे. अचानकपणे हेल्मेटची अंमलबजावणी सुरू केल्याने नागरिक गडबडले आहेत. याचाही सरकारने विचार करायला हवा. मंगेश तेंडुलकर,ज्येष्ठ व्यंगचित्रकार
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट