'हवामानासंबंधी माहितीचा सर्वसामान्य शेतकरी आणि मच्छीमारांना थेट फायदा व्हावा यासाठी भूविज्ञान मंत्रालयाच्या पुढाकाराने स्वतंत्र यंत्रणा विकसित करण्यात येत आहे. या यंत्रणेअंतर्गत खासगी आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने शेती आणि मत्स्य व्यवसायासाठी उपयुक्त माहिती, तसेच हवामानाचे अंदाज देशातील नऊ कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे,' अशी माहिती केंद्रीय भूविज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सोमवारी दिली. डॉ. हर्षवर्धन तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून, या वेळी शहरातील संशोधन संस्थांमधील कामाची पाहणी ते करणार आहेत. पाषाण येथील 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रिओलॉजी'ला (आयआयटीएम) भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी भूविज्ञान मंत्रालयाच्या प्रकल्पांची माहिती दिली. या वेळी भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. राजीवन, आयआयटीएमचे प्रभारी संचालक डॉ. आर. कृष्णन उपस्थित होते. डॉ. हर्षवर्धन म्हणाले, की 'भारतातील हवामान अंदाजामध्ये गेल्या काही वर्षांत चांगली सुधारणा झाली असून, विविध वापरकर्त्यांसाठी आवश्यक अशी माहिती स्वतंत्रपणे निर्माण केली जात आहे. अशा माहितीचा लाभ सध्या देशभरातील एक कोटींहून अधिक शेतकरी आणि मच्छीमारांना होत आहे. या माहितीच्या आधारे त्यांच्या उत्पन्नात २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचेही दिसून आले आहे. ही माहिती आता नऊ कोटी शेतकरी आणि मच्छीमारांपर्यंत पोचवण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी खासगी आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार असून, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास इच्छुक असणाऱ्या तरुणांनाही त्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. या संस्था आणि तरुणांना मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या संस्था आणि तज्ञांमार्फत मार्गदर्शनही करण्यात येईल,' असे त्यांनी सांगितले. यंदापासून उन्हाळ्याचाही अंदाज ! मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजाप्रमाणे यंदापासून उन्हाळ्याचाही दीर्घकालीन अंदाज देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. राजीवन यांनी दिली. ते म्हणाले,की 'गेल्या काही वर्षांत उष्णतेच्या लाटांची संख्या आणि तीव्रता वाढली असून, सर्वसामान्यांसह विविध घटकांना त्याचा फटका बसत आहे. त्यासाठी यंदाचा उन्हाळा कसा असेल याचा हंगामी अंदाज येत्या मार्चमध्ये देण्यात येईल. एप्रिल, मे आणि जून या महिन्यांतील कमाल तापमान आणि उष्णतेच्या लाटांची कल्पना त्याद्वारे येऊ शकेल.'
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट