महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) पंचवार्षिक निवडणुकीत कार्याध्यक्षपदासाठी पंचरंगी निवडणूक रंगणार आहे. कार्याध्यक्षपदासाठी राजीव बर्वे, मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, श्रीधर कसबेकर आणि सुनील महाजन यांच्यात लढत होणार असून, ३३ जागांसाठी दाखल झालेल्या ९० अर्जांपैकी एक अर्ज छाननीदरम्यान अवैध ठरला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी अॅड. प्रताप परदेशी यांनी ही माहिती दिली. मसापच्या निवडणुकीसाठी एकूण १३३ उमेदवारी अर्जांची विक्री झाली. त्यापैकी ९० अर्ज दाखल झाले. त्यातील अहमदनगर जिल्हा प्रतिनिदापदासाठीचा अशोक भानुदास यांचा अर्ज अवैध ठरला आहे. ठाणे (३), नाशिक (२), सांगली (१) आणि धुळे-नंदुरबार (१) या जिल्हा प्रतिनिधींची आणि पुणे शहर स्थानिक कार्यवाह क्र. ४ साठी माधव राजगुरू यांची बिनविरोध निवड झाली आहे. यामुळे आता या आठ जागा वगळता उर्वरित २५ जागांवर निवडणूक होणार आहे. प्रमुख कार्यवाहपदासाठी प्रकाश पायगुडे, प्रमोद आडकर आणि सुनील महाजन, कोषाध्यक्ष पदासाठी योगेश सोमण, अनिल कुलकर्णी, सुनीताराजे पवार, सतीश देसाई आणि ह. ल. निपुणगे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. स्थानिक कार्यवाहपदासाठी (क्र. १) दीपक करंदीकर, ज्योत्स्ना चांदगुडे, स्थानिक कार्यवाहपदासाठी (क्र. २) नीलिमा बोरवणकर, बंडा जोशी, जयंत भिडे, स्थानिक कार्यवापदासाठी (क्र. ३) स्वप्नील पोरे, उद्धव कानडे, स्थानिक कार्यवाहपदासाठी (क्र. ५) रमेश राठिवडेकर, वि. दा पिंगळे आणि स्थानिक कार्यवाहपदासाठी (क्र. ६) पदासाठी बाळासाहेब कुलकर्णी, घन:श्याम पाटील, प्रमोद आडकर हे निवडणूक लढवित आहेत. पुणे शहर प्रतिनिधीपदासाठी संदीप सांगळे, श्रीधर कसबेकर, महेंद्र फाटे, सतीश देसाई, क्षितिज पाटुकले, शिवाजीराव पाटील, नंदा सुर्वे, शिरीष चिटणीस, अरविंद संगमनेरकर, मधुमिलिंद मेहेंदळे, शंतनू चिंधडे आणि अनिल गोरे यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी आज, सोमवारी (२५ जानेवारी) अखेरचा दिवस आहे. त्यानंतर निवडणुकीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. लेखक कुठे गेले ? मराठी सारस्वतांची आद्य संस्था असलेल्या मसापमध्ये साहित्यिक नसलेले लोक पदांवर असल्याबाबत लेखकांकडून अनेकदा नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. या निवडणुकीत लेखकांचे स्वतंत्र पॅनेल उभे राहणार असल्याचीही चर्चा होती. प्रत्यक्षात, काही मोजक्या लेखकांचे अपवाद वगळता लेखकांनी निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केलेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत लेखकांचे पॅनेल उभे राहणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साहित्य बाह्य लोकांचे मसापमध्ये काम काय, असा प्रश्न उपस्थित करणारे लेखक आता कुठे गेले अशी चर्चा साहित्य वर्तुळात सुरू आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट