म. टा. प्रतिनिधी, पुणे कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला नगररोडवरील बीआरटी मार्गाचे उद्घाटन २६ जानेवारीला करण्याचा महापालिकेने काढलेला मुहूर्त चुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बीआरटीच्या बस टर्मिनलसाठी वाघोली जवळील जागा देण्यास ग्रामपंचायतीने अनेक जाचक अटी घातल्याने त्याची पुर्तता करणे पालिकेला शक्य होणार नाही. दरम्यान, ग्रामस्थांनी जागा देताना घातलेल्या अटींमुळे महापालिका हद्दीमध्येच टर्मिनल उभारण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला असून, या भागात असलेल्या जकातनाक्यांच्या जागांची पाहणी बुधवारी करण्यात आली. संमगवाडी, विश्रांतवाडीपाठोपाठ २६ जानेवारी रोजी नगररोडवरील बीआरटी सुरू करण्याची घोषणा महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी केली होती. विश्रांतवाडी मार्गावर बस वळविण्यासाठी आवश्यक टर्मिनलची जागा ताब्यात न घेता मार्ग सुरू केल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. टर्मिनलसाठी जागा उपलब्ध होईपर्यंत या मार्गावर बीआरटी सुरू केली जाणार नाही, असे पीएमपीने कळविले होते. यावर वाघोली, केसनंद येथील ग्रामपंचायतीची जागा टर्मिनलसाठी घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. मात्र, ही जागा देण्यास ग्रामपंचायतीने विरोध दर्शविला. ग्रामपंचायतीला पालिकेने दिलेले दीड कोटी रुपयांचे पाणीबील (पाणीपट्टी) माफ करावे, भामा आसखेड धरणातून एक टीएमसी पाणी द्यावे, वाघोली भागात मैलापाणी शुद्धीकरणाचा प्रकल्प (एसटीपी) उभारावा, अशा अनेक अटी ग्रामपंचातीने घातल्या आहेत. या अटींची पूर्तता शक्य नसल्याने टर्मिनलसाठी नवीन जागेचा शोध पालिकेने सुरू केला आहे. अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्यासह अधिकाऱ्यांनी पर्यायी जागेची पाहणी केली. जकातनाक्यांसह काही मोकळ्या जागा पीएमपीएमएलला दाखविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट