ज्ञानोबा-तुकाराम साहित्यनगरी, पिंपरी : काळ बदलला, माध्यमे बदलली तरी तरुणाईची व्यक्त होण्याची प्रेरणा कायम आहे आणि कायमच राहील; मोठ्यांनी तिच्या भवितव्याची चिंता करण्याचे कारण नाही, असा सूर ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सोमवारी झालेल्या 'आजची तरुणाई : काय वाचते? काय लिहिते?' या परिसंवादात व्यक्त करण्यात आला.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे उपमंडपात रंगलेल्या या परिसंवादाचे अध्यक्षस्थान 'महाराष्ट्र टाइम्स'च्या नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित यांनी भूषविले. प्रसिद्ध लेखक राजन खान, प्रा. राजेंद्र मुंडे, जुई कुलकर्णी आणि कैलास इंगळे या वक्त्यांनी परिसंवादात भाग घेतला.
प्रा. मुंडे म्हणाले, 'आजची तरुण पिढी टेक्नोसॅव्ही आहे. या पिढीला तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अत्याधुनिक संवाद साधने उपलब्ध आहेत. माध्यमे बदलली, तरी ही पिढी वाचत आहे. त्या त्या काळातील माध्यमावर तरुण स्वार होत असतात. आजच्या आयटीमधील तरुणांना फँटसीची ओढ आहे. अनुवादित साहित्याकडेही त्यांचा कल दिसून येतो. अनेक तरुण धाडसाने आपले म्हणणे मांडताना दिसतात. त्यांची भाषा हायब्रीड आहे. त्यांच्या पुस्तकांची नावेही वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यावरून त्यांच्या लिखाणातील जोरकसपणा दिसून येतो. आजची पिढी सकस लिहिते आणि तेच तिचे सामर्थ्य आहे.'
जुई कुलकर्णी म्हणाल्या, 'तरुणाई फेसबुक, व्हॉट्सअॅप किंवा किंडलवर वाचते. त्यांच्या वाचनात क्वांटिटी असली, तरी क्वालिटी असतेच असे नाही. फक्त इथे लिहिणारे सर्व स्तरांतले असतात. ते पेशाने लिहिणारे असतीलच असे नाही. या माध्यमात दादही थेट व लगेच मिळते. अट्टल वाचणारे मात्र मुद्रित पुस्तके वाचणे सोडत नाहीत. आजच्या तरुणाईला अनुवाद वाचायला आवडतात. त्यातून मराठी माध्यमातून शिकलेल्या पिढीला इंग्रजीतील पुस्तकांचे मराठी अनुवाद म्हणजे जगाची उघडलेली खिडकी वाटते. इंग्रजीतील तत्त्वज्ञान वाचायला आवडते. चेतन भगतसारखा लेखक चटपटीत लिहितो, सोपे इंग्रजी लिहितो, म्हणून तो तरुणाईला आवडतो. सोशल मीडियामुळे समाजातले बरेच भेद नष्ट झाले. हे सपाटीकरण लेखनाच्या बाबतीत स्वागतार्ह आहे.'
कैलास इंगळे यांनी आजच्या तरुणाईच्या माध्यमांची अनोखी ए टु झेड अशी 'एबीसीडी'च सादर केली. राज्य साहित्य-संस्कृती मंडळाने नव्याने लिहिणाऱ्या तरुणाईचे पहिले पुस्तक काढावे, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.
अध्यक्षीय समारोप करताना श्रीपाद अपराजित यांनी तरुणाईच्या अभिव्यक्तीविषयी सकारात्मक सूर व्यक्त केला. विदर्भातील अनेक लहान गावांतून आलेल्या मुलांच्या सकस लेखनाचे दाखले त्यांनी या वेळी दिले. आजच्या तरुणाईचे समाजभान हरपलेले नाही, असे निःसंदिग्ध प्रतिपादन करताना ते म्हणाले, 'मोबाइल हे आजच्या पिढीचे अस्त्र आहे. त्यांना त्यांचे आक्रंदन सोशल मीडियावर मांडता येते, ही चांगली गोष्ट आहे. गांधी-आंबेडकर यांचे आजच्या तरुण पिढीला आकर्षण आहे. बाजीराव मस्तानी सिनेमानंतर राऊ कादंबरीचा खप वाढला. तरुणाईचे मार्ग वेगळे आहेत; पण त्यांची जाणण्याची उत्सुकता कायमच आहे. आजची पिढी संभ्रमावस्थेत आहे, असे वाटत असले, तरी नव्या संकल्पना रुजवण्यातही हीच पिढी आघाडीवर आहे.'
तरुणांची अभिव्यक्ती खोटी : राजन खान
राजन खान यांनी मात्र अन्य वक्त्यांपेक्षा वेगळा सूर लावून, आजच्या तरुणाईला कानपिचक्या दिल्या. सोशल मीडियावरही कंपूशाही दिसते. तेथेही गट-तट दिसतात. जात तेथूनही गेलेली नाही, अशी टीका त्यांनी केली. पूर्वी चांगले लिहिणारे शंभर-दीडशे जण असायचे. आज चाळिशीतला राज्यभर नाव असणारा एक तरी सकस लेखक दाखवा, असे आव्हान खान यांनी उपस्थितांना दिले. आजच्या तरुणाईची अभिव्यक्ती खोटी असून, त्यांचे लेखन आत्मकेंद्री आहे, असे बजावून काळावर मात करणारे लेखन करणारी तरुणाई कुठे आहे, असा सवाल त्यांनी केला. जो माणूस व्यवस्थेत कमकुवत असतो, तोच चांगला लेखक वा कवी होतो, असे स्पष्ट करून, समाजाला मार्गदर्शन करणारे लेखन आज कुठे दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट