म. टा. प्रतिनिधी, पुणे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन्, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासह अनेक दिग्गजांनी वास्तव्य केलेले रामटेकडीतील राज्य राखीव पोलिस मैदानावरील (एसआरपीएफ) 'चैत्रबन' हे गेस्ट हाउस कात टाकणार आहे. राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने गेस्ट हाउसच्या १९५४ पासूनच्या आठवणींना उजाळा मिळणार आहे. वानवडी येथील राज्य राखीव दलाच्या ग्रुप दोनच्या परिसरात गेस्ट हाउस बांधण्यात आले आहे. या छोटेखानी वास्तूमध्ये राहण्यासाठी दोन खोल्या, हॉल आणि स्वयंपाकघर आहे. या गेस्ट हाउसमध्ये माजी राष्ट्रपती राधाकृष्णन् यांनी ३० डिसेंबर १९५४ मध्ये वास्तव्य केले होते.येथील 'व्हिजिटर बुक'मध्ये त्यांनी अभिप्रायही नोंदविला आहे. त्यानंतरही येथे दिग्गजांनी वास्तव्य केल्याच्या नोंदी आढळतात. तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई, तसेच पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांनीही या गेस्ट हाउसला भेट देऊन'व्हिजिटर बुक'मध्ये नोंद केली आहे. पोलिस आणि संरक्षण विभागातील मोठ-मोठे अधिकारी तसेच तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार देखील येथे राहिल्याच्या नोंदी आहेत. गेल्या ६२ वर्षांहून अधिक काळ पोलिस दलाच्या सेवेत असलेल्या 'चैत्रबन'चे काही वर्षांपूर्वी नूतनीकरण झाले. मात्र, सध्या त्याची अवस्था अत्यंत खालावली होती. स्पर्धांच्या निमित्ताने ग्रुपचे कमाडंट मनोज पाटील यांनी मैदानासह या गेस्ट हाउसचे रंगरूप बदलण्याचा निर्णय घेतला. गेस्ट हाउसचे छत, फ्लोरिंग आणि रंगरंगोटी करण्यात आली आहे.या स्पर्धांचे औपचारिक उद् घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज, गुरुवारी होत आहे. गोवा मुक्ती संग्रामातही आघाडीवर गोवा मुक्ती संग्रमासाठी १९६१मध्ये झालेल्या पोलिस कारवाईत 'एसआरपीएफ'च्या ग्रुप दोनने महत्त्वाची भूमिका बजावली. या कारवाईचे पंडित नेहरू यांनी कौतुक केले होते. सुरुवातीला केवळ दोन ग्रुप असलेल्या 'एसआरपीएफ'चा विस्तार सोळा ग्रूपमध्ये झाला असून, १६ हजार सशस्त्र जवान सध्या कार्यरत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट