म. टा. प्रतिनिधी, पुणे
जागतिक पातळीवर यापूर्वी कधीही मिळत नव्हते, एवढे महत्त्वाचे स्थान सध्या भारताला मिळत आहे. अशा परिस्थितीमध्ये देशाची कामगिरी उंचावण्यासाठी युवा पिढीने स्वार्थी आणि अल्पसंतुष्ट होण्यापेक्षा देशहिताच्या दीर्घकालीन धोरणांचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असे मत 'इन्फोसिस'चे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी मंगळवारी व्यक्त केले. देशाला असे स्थान पुन्हा मिळण्याची शक्यता कमी असल्याने, ही संधी दवडू नका असा सल्लाही त्यांनी दिला.
भारती विद्यापीठाच्या १७व्या पदवीप्रदान समारंभाचे मंगळवारी विद्यापीठाच्या कात्रज परिसरातील कँपसमध्ये आयोजन करण्यात आले होते. या समारंभामध्ये मूर्ती यांच्यासह ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना विद्यापीठातर्फे मानद डी. एस्सी पदवीने गौरविण्यात आले. या वेळी विद्यापीठाने पाच हजार ९०५ विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित पदव्या बहाल केल्या. तसेच, मान्यवरांच्या हस्ते ७७ विद्यार्थ्यांना पीएचडी पदवीने, तर ३० विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांनी सन्मानित करण्यात आले. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मूर्ती बोलत होते. डॉ. माशेलकर, विद्यापीठाचे कुलपती डॉ. पतंगराव कदम, डॉ. कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम यांच्यासह विद्यापीठाचे इतर पदाधिकारी या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
मूर्ती म्हणाले, 'देश एकीकडे प्रगतीपथावर असताना दुसरीकडे दारिद्र्य, निरक्षरता, कुपोषण अशा समस्यांनी घेरलेला भारतही आपण अनुभवत आहोत. सर्वाधिक भ्रष्टाचारी देशांमध्ये भारताचे नाव घेतले जाते. मूलभूत आणि उच्च शिक्षणाच्या बाबतीत देशामध्ये दयनीय परिस्थिती आहे. वयाच्या विशीमध्ये अत्यंत हुशार, आदर्शवादी आणि आत्मविश्वासाने भारावलेल्या तरुणांना वयाच्या चाळीशीमध्ये खचलेले, दिशा हरवलेले, स्वतःपुरते मर्यादीत ठेवणारे आणि दुःखी बनवणारीरचना आपल्याकडे अस्तित्त्वात आहे, हे सर्वांत मोठे दुर्दैव आहे. ही परिस्थिती बदलण्याची ताकद युवा पिढीमध्ये आहे.' 'गांधीजींच्या स्वप्नामध्ये अपेक्षित असलेल्या प्रगतीशील देशाची उभारणी होण्यासाठी आदर्शवाद, आत्मविश्वास, आशा, ऊर्जा आणि उत्साहाने भारलेले नागरिक महत्त्वाचे आहेत.
त्यासाठी युवा पिढीने मोठी मेहनत करण्याची गरज. आम्ही विद्यार्थी असताना तशी संधी आमच्यापुढे नव्हती, जी सध्याच्या पिढीसमोर आहे. त्यामुळेच आपण सर्वप्रथम भारतीय आहोत, ही जाणीव आपल्यामध्ये जागृत व्हायला हवी. गुणवत्तेला प्राधान्य द्यायला हवे आणि त्या आधारे ज्या संधी आपल्यासमोर येतील, त्यात झोकून देऊन काम करायला हवे. यशस्वी होण्यासाठीची शिस्त अंगी बाणवायला हवी. वैयक्तिक स्वार्थांच्या पलिकडे जात देशहिताचा विचार करायला हवा,' असेही मूर्ती यांनी स्पष्ट केले. डॉ. माशेलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
'मोठ्ठे व्हा, नारायण मूर्ती व्हा'
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. माशेलकर यांनी आपल्या जीवनातील एक प्रसंग सांगितला. डॉ. माशेलकर परदेशातून भारतात परतल्यानंतर त्यांना एका व्यक्तीने आशीर्वाद देताना 'मोठ्ठा हो, जयंत नारळीकर हो,' असे सांगितले होते. हा संदर्भ घेत त्यांनी उपस्थितांना नारायण मूर्ती यांचे कार्य विचारात घेता, 'तुम्ही सर्वांनी असेच मोठ्ठे व्हा, नारायण मूर्ती व्हा,' असा आशीर्वाद आपण देत असल्याचे त्यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट