दिल्ली येथे सम-विषम तारखेनुसार चारचाकी वाहने रस्त्यावर आणण्याचा निर्णय पुण्यात लागू करण्याची काहीच आवश्यकता नाही. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केल्यास दुसऱ्या कोणत्याही पर्यायाची गरज नाही. दिल्लीतील सम विषय वाहतुकीचा निर्णय प्रदूषणात वाढ झाल्यामुळे घेतला आहे, असे मत वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केले. दिल्लीत सम-विषम तारखेनुसार चारचाकी वाहने रस्त्यावर आणण्याचा निर्णय शुक्रवारपासून अंमलात आला आहे. दिल्लीतील वाढते प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी अरविंद केजरीवाल सरकारने सम-विषम तारखेनुसार चारचाकी वाहने दिल्लीतील रस्त्यावर आणण्याचा निर्णय घेतला. या निर्णयातून सीएनजी गाड्या आणि दुचाकींना वगळण्यात आले आहे. १ ते १५ जानेवारी दरम्यान सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत दिल्लीमध्ये ही योजना अंमलात येणार आहे. या बाबत पुण्यातील काही वाहतूक तज्ज्ञांनी संपर्क साधला असता पुण्यात अशा प्रकारची योजना राबविण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यात दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. त्याबरोबरच पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होतो. पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम केल्यास दुसऱ्या कोणत्याही पर्याची आवश्यकता राहणार नाही. दिल्लीतील सम-विषम वाहने रस्त्यावर आणण्याचा निर्णय वाढते प्रदूषण पाहता घेण्यात आला आहे. पुणेच काय मुंबईतसुद्धा हा निर्णय घेण्याची आवश्यकता नसल्याचे वाहतूक तज्ज्ञांनी सांगितले. दिल्लीत मेट्रो, लोकल ट्रेन, स्थानिक बस सेवा अशी सर्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम आहे. पुण्यात पीएमपीबरोबरच इतर बीआरटी, मेट्रो सारखी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था समक्ष झाल्यास इतर पर्याय शोधण्याची गरज लागणार नसल्याचे वाहतूक तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट