पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वेवर आडोशी, खंडाळा बोगदा परिसरातील दरडप्रवण क्षेत्रात लोखंडी जाळ्या (रॉक बोल्टिंग) बसविण्याच्या कामासाठी लागणारे सर्व साहित्य परदेशातून येण्यासाठी विलंब झाला आहे. त्यामुळे एक्स्प्रेस-वे पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पावसाळ्यात आडोशी आणि खंडाळा बोगदा परिसरात दरड कोसळून दुर्घटना झाल्या होत्या. त्यानंतर जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, मुंबई आयआयटीतील तज्ज्ञ व इटालियन शास्त्रज्ञांनी या भागाची पाहणी करून दरडप्रवण क्षेत्रे निश्चित केली होती. त्यांच्या सूचनेनुसार धोकादायक ठिकाणी लोखंडी जाळ्या बसविण्याचे काम सुरू केले. तेव्हापासून पुण्याहून मुंबईच्या दिशेला जाणारी एक लेन बंद ठेवण्यात आली आहे. हे काम नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होऊन बंद लेनही सुरू होईल, अशी शक्यता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वर्तविली होती. पण, परदेशी साहित्य उशिरा प्राप्त झाल्याने काम पूर्ण होण्यास विलंब झाला आहे. आडोशी व खंडाळा बोगदा परिसरात जाळ्या बसविण्याचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. तीन ठिकाणी जाळ्या बसविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या परिसरात उच्च दर्जाच्या जाळ्या बसविण्यात येत आहेत. तसेच जाळ्या घट्ट बसविण्यासाठी 'रॉक बोल्टिंग'चा वापर केला जात आहे. त्यामुळे जाळ्या बसविलेल्या परिसरामध्ये एकही दगड रस्त्यावर पडणार नाही, असे 'एमएसआरडीसी'चे कार्यकारी अभियंता संजय गांगुर्डे यांनी सांगितले. ----- वास्तविक, हे जाळ्या बसविण्याचे काम पूर्ण करण्याची मुदत १५ फेब्रुवारी आहे. मात्र, मुदतीच्या आधीच हे काम पूर्ण करण्याचे एमएसआरडीसीचे उद्दिष्ट होते. त्यानुसार आतादेखील मुदतीपूर्वी रस्ता संपूर्ण क्षमतेने सुरू करण्याकडे लक्ष दिले जाईल. संजय गांगुर्डे, कार्यकारी अभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळ
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट