म. टा. प्रतिनिधी, पुणे
पावसाळा संपून थंडीचा चाहूल लागली की शहरात महोत्सवांचे पीक येते. दिवाळी पहाटपासून ते पुढे सवाई गंधर्व व इतर अनेक महोत्सव शहरात विविध मैदानांमध्ये रंगतात. किमान दहा हजार रसिक एका ठिकाणी जमल्यामुळे सर्व यंत्रणेवरच ताण येतो. अशा वेळी नागरिकांची सुरक्षा घेत कार्यक्रम यशस्वी करून दाखवणे हे आव्हान आयोजकांपुढे असते. आग, चेंगराचेंगरी अशा घटना टाळण्यासाठी विशेष खबरदारी घ्यावी लागते. यापुढील काही महिने महोत्सवी असल्याने या घटना घडू नयेत, यासाठी यंत्रणेला सतर्क राहावे लागणार असून, आत महोत्सव कितीही रंगला असला, तरी यंत्रणेसंबंधित प्रत्येक घटकासाठी हा काळ कसोटीचाच असेल.
दिवाळी पहाट झाली की शहरात विविध कार्यक्रम रंगू लागतात. सवाई गंधर्व, पुलोत्सव, स्वरझंकार, वसंतोत्सव याबरोबरच भीमथडी जत्रा असे एकामागून एक महोत्सव शहरामध्ये होतात. शाळेच्या अथवा महाविद्यालयांच्या मैदानांवर हे कार्यक्रम होत असल्याने कार्यक्रमांसाठी विशेष काळजी घ्यावी लागते. रमणबागेच्या मैदानावर सवाई गंधर्व, पुलोत्सव, स्वरझंकार, वसंतोत्सव असे महोत्सव रंगतात. रमणबागेचाच विचार करायचा झाला, तर शाळेच्या मैदानाला तीन प्रवेशद्वार आहेत. त्यातील एक कायमस्वरूपी बंद असते. मुख्य प्रवेशद्वार महोत्सवकाळात फक्त विशेष व्यक्तींसाठी खुले असते. रसिकांना शनिवार पेठेतील मागच्या दाराने आत-बाहेर करावे लागते. त्यात पुन्हा तिकीट मिळाले नाही... आत सोडा, असा आग्रह करणारे रसिक शेकडोच्या संख्येने बाहेर उभे असतात.
आता सवाईच्याच वेळेला अशा रसिकांनी रमणबाग व नवीन मराठी शाळेच्या मधील रस्ता संपूर्ण व्यापला होता. हुज्जत घालणाऱ्या रसिकांमुळे चेंगराचेंगरी होण्याची भीती निर्माण झाली होती. साधारण दहा हजार लोक एकत्रित येत असल्याने व एकच प्रवेशद्वार असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने यावर उपाय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण यापुढील काळात असेच महोत्सव या मैदानावर होणार आहेत.
या महोत्सवांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे खाद्य पदार्थांचे स्टॉल. पुणे म्हटले की खवय्ये लोक आले. चटपटीत काही असेल आणि त्यावर खवय्यांच्या उड्या पडल्या नाही तर नवलच. महोत्सवांमध्ये जिभेचे चोचले पुरविणाऱ्या चविष्ट व हटके पदार्थांचे अनेक स्टॉल असतात. भीमथडी जत्रा तर त्यासाठीच प्रसिद्ध आहे. अस्सल गावरान पदार्थ खायला मिळत असल्याने खवय्ये महोत्सव काळात या स्टॉलवर गर्दी करतात. काहीजण तर फक्त चमचमीत खायला मिळते म्हणून अशा ठिकाणी येतात. स्टॉलवरच पदार्थ बनविले जात असल्याने याठिकाणी सावधानता बाळगणे अत्यंत महत्वाचे झाले आहे.
महोत्सवासाठी विविध परवाने घेण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. पोलिस, पालिका प्रशासन, अग्निशमन दल अशा सुमारे दहा परवान्यांमधून जावे लागते. हे परवानेही मिळतात. त्यासाठी फारशी आडकाठी होत नाही. पण आयोजकांची भूमिका इथेच संपत नाही. सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्त असतो किंवा अग्निशमन दलाचे जवान असतात, म्हणून गाफील राहण्याचा प्रयत्न आयोजकांनी करू नये. महोत्सवातील प्रत्येक घटकाला अगदी कलावंत, रसिकांपासून ते कामगारांना काही त्रास होणार नाही. सर्वजण सुरक्षित राहतील ही काळजी संयोजकांनी घेतली आणि बाकीच्या घटकांनीही संयोजक, पोलिस यांच्याशी हुज्जत न घालता सूचनांचे पालन केले, तरच महोत्सव खऱ्या अर्थाने रंगतील व भैरवी सुरेल होईल, अशी भावना रसिक व्यक्त करतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट