राज्यातील सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झाली असूनही सत्ताधारी पक्षाचे खासदार-आमदार पूर्णतः गप्प बसले असल्याने त्यांना झोपेतून जागे करण्यासाठी शिवसेनेतर्फे 'वरण-भात' आंदोलन केले जाणार आहे. आज, मंगळवारपासून तीन दिवस सर्व विधानसभा मतदारसंघांत पथनाट्ये सादर केली जाणार असून, शुक्रवारी (११ डिसेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण आणि माजी आमदार महादेव बाबर व चंद्रकांत मोकाटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.
'महागाई कमी करण्यासह डाळींचे गगनाला भिडणारे भाव आटोक्यात ठेवण्यात राज्य सरकारला पूर्ण अपयश आले आहे. मोठ्या प्रमाणात डाळ जप्त करून सर्वसामान्यांना अद्याप त्याचा लाभ मिळालेला नाही. दैनंदिन आहारातील पौष्टिक वरण-भाताच्या जेवणावरचा खर्चही वाढत चालला असल्याने त्याकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे,' असे निम्हण यांनी सांगितले.
सरकारच्या नव्या केरोसीन वाटप नियमांनुसार शहरातील गोरगरीब जनतेला केवळ चार लिटर केरोसीन दिले जाणार आहे. या चार लिटरमध्ये दोन वेळचे जेवण कसे करणार, असा प्रश्न उपस्थित करून या नियमांमध्ये बदल केला जावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांतील ठराविक चौकांमध्ये मंगळवारपासून शिवसेनेचे रथ फिरणार असून, त्याद्वारे पथनाट्य आणि नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार असल्याचे बाबर यांनी सांगितले.
केवळ गोडवे न गाता चुका दाखवून देणारा खरा मित्र म्हणून ओळखला जातो. म्हणूनच भाजप हा आमचा मित्रपक्ष असला, तरी चुका दाखवून त्यातून बोध घेता यावा, यासाठीच हे आंदोलन केले जाणार आहे.
- विनायक निम्हण, शहरप्रमुख, शिवसेना
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट