स्वरानंद प्रतिष्ठानतर्फे संस्थेच्या ४५व्या वर्धापनदिनी आज (दि. १) यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात गायन- वादनासह 'स्वरांजली' संस्थेचे प्रदीप माळी यांचाही विशेष गौरव करण्यात येणार आहे. ध्वनी संयोजन क्षेत्रातील त्यांचा रौप्य महोत्सव आणि या सत्काराविषयी त्यांच्याशी आसावरी चिपळूणकर यांनी केलेली बातचीत.
ध्वनी संयोजन क्षेत्रातील वाटचाल कधी आणि कशी सुरू झाली?
माळी : आणीबाणीच्या काळात वीजकपात झाली होती, तेव्हा मला कंपनीतील कामावरून कमी करण्यात आले. मग सुरुवातीला नानासाहेब आपटे यांच्या 'ललकार' संस्थेत दोन- तीन वर्षे काम करून थिएटर अॅकॅडमीमध्ये लाइट आणि साउंडचे काम केले. त्यानंतर १९७८ साली मी घरातच स्वतःचा साउंड सिस्टीमचा व्यवसाय सुरू केला. काही काळ आम्ही 'युवोन्मेष' हा फक्त तरुण कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा कार्यक्रमही केला. त्यात गणपती भट, देवकी पंडित यांसारखे कलाकार गायले आहेत.
सुरुवातीला कार्यक्रम मिळवताना अडचणी आल्या का?
माळी : सुदैवाने 'युवोन्मेष'मुळे 'साउंड'मधला माणूस अशी ओळख निर्माण झाली होती आणि मला एक दुसरी नोकरीसुद्धा मिळाली होती. ध्वनी संयोजनात मला कुणाशीही स्पर्धा करायची नव्हती. मात्र, सुरुवातीला शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना बोलावणे यायचे नाही. एकदा विचारणा झाल्यावर मी रोलांड कंपनीचा ऑडिओ मिक्श्चर वापरला. फक्त अॅम्प्लिफायर वापरून होणाऱ्या मैफलीपेक्षा या सिस्टीममुळे साउंड अगदीच वेगळा ऐकू आला. त्यातच अधिक सुधारणा म्हणून मी अमेरिकेतील बोस कंपनीचे स्पीकर मागवले. ते कार्यक्रमांतून वापरू लागलो. माझ्याआधी फक्त अशोक सराफ त्यांच्या ऑर्केस्ट्राला मिक्श्चर वापरायचे. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांमध्ये माझ्या या नव्या सिस्टीममुळे उत्तम दर्जाचा 'साउंड' मिळू लागला आणि मला अधिकाधिक विचारणा होऊ लागली.
कार्यक्रमाआधी साउंड सिस्टीमसंदर्भात नेमक्या कुठल्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात?
माळी : सवाई गंधर्व महोत्सवात गेली अनेक वर्षे मी ध्वनी संयोजन करतो. तिथे रविवारी सकाळी आणि संध्याकाळी ऐकू येणाऱ्या 'साउंड'मध्ये फरक असतो; कारण दिवसा ऊन असते. हवा कोरडी असते. मात्र, रात्रीच्या ओलसर हवेत साउंड जास्त चांगल्या दर्जाचा मिळतो. म्हणजेच दिवस- रात्रीप्रमाणेच कार्यक्रम सभागृहात होणार, की खुल्या पटांगणात हेसुद्धा लक्षात घ्यावे लागते. हवामानाप्रमाणेच अॅकॉस्टिकही (ध्वनीशास्त्र) महत्त्वाचे ठरते. परदेशात ध्वनीशास्त्रतज्ज्ञ किंवा इंजिनीअर असतो. तिथली माणसे आपसांत हळू बोलतात, रस्त्यांवर फार वेळा हॉर्नही वाजवत नाहीत. आपल्या लोकांची ऐकण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे 'साउंड' ऐकण्याची सवय नाही. उदाहरणच द्यायचे, तर सुरुवातीला गणेश कला क्रीडा मंच येथे अॅकॉस्टिकचे कार्यक्रम व्हायचे नाहीत. अनिरुद्ध भावे यांनी तिथे सुधारणा करून दिल्यानंतर अॅकॉस्टिकचेही कार्यक्रम व्हायला लागले.
एखाद्या कलाकाराविषयीची विशेष आठवण...
माळी : आतापर्यंत मी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना सर्वाधिक ध्वनी संयोजन केले आहे. त्यामुळे किशोरी अमोणकर, मालिनी राजुरकर, डॉ. प्रभा अत्रे, पं. अजय पोहनकर, मोहनवीणा वादक विश्वमोहन भट, सरोद वादक बिस्वजित रॉय- चौधरी, हार्मोनियम वादक सुयोग कुंडलकर, गायिका प्रियदर्शिनी कुलकर्णी, गायक आनंद भाटे, तबला वादक विजय घाटे, कथक नृत्य कलाकार प्रताप पवार, तबला वादक भरत कामत, यांसारख्या शास्त्रीय संगीत क्षेत्रातील कलाकारांसह शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे व्याख्यान, 'करुणोपनिषद'च्या निमित्ताने सोनाली कुलकर्णी, चंद्रकांत काळे आणि सचिन खेडेकर या सर्वच कलाकारांचा मला फार छान अनुभव आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट