म. टा. प्रतिनिधी, पुणे
इंटरनेट, संगणक युगात 'ऑनलाइन' व्यवहार होत असल्याने पारंपरिक चोपड्या, वह्यांना असलेली मागणी सुमारे २५ टक्क्यांनी घटली आहे. मागणी घटली असली, तरी मुहूर्तावर दोन ते तीन वह्या खरेदी करण्यास व्यापारी आग्रही असल्याने बोहरी व्यापाऱ्यांकडे त्यासाठी 'बुकिंग' करण्यात आले आहे. किरकोळ ग्राहकांकडून चोपड्या खरेदीसाठी गर्दी होत आहे.
एखादा व्यापारी चोपड्यांच्या खरेदीसाठी दुकानात आला, तर त्याच्या हातात लाल रंगाच्या कापडी व विशिष्ट पद्धतीच्या दोऱ्यांनी शिवलेल्या चोपड्या, रोजमेळ, खतावणीचे गाठोडे दिले जाते. त्या वेळी चोपड्यांवर लक्ष्मीचे कॅलेंडर, पूजेचे पान ठेवले जाते. त्यावर हळद-कुंकू वाहून त्यांची पूजा केल्यानंतर त्या चोपड्या व्यापाऱ्याकडे देण्याची ही प्रथा आहे. त्या वेळी रविवार पेठेतील कुरबानहुसेन चांदाभाई दुकानाचे मालक तय्यबभाई चोपडावाला 'लखलख लाभो' असे म्हणतात. आजही बोहरा समाजातील चोपड्यांचे व्यापारी ही प्रथा पाळताना दिसत आहेत. चोपड्या घेताना समोरचा व्यापारीदेखील तेवढ्याच आदराने त्यांच्याकडून चोपड्या घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
'दीडशे वर्षांपासून आमचे दुकान चोपड्यांचा व्यवहार करत आहे. आम्ही स्वतःच चोपड्या तयार करतो. रोजमेळ, खतावणी, व्यापाऱ्यांना हव्या तशा स्वरूपातील वह्या तयार करून देतो. आमच्या काही पिढ्या याच व्यवसायात काम करत आहेत. वर्षभरात लागणाऱ्या हिशेबाच्या जमा-खर्चाच्या वह्या एकाच वेळी मुहूर्तावर खरेदी करण्याची प्रथा हिंदू व्यापाऱ्यांमध्ये आहे. हिंदू व्यापारी आला, तर 'लखलख लाभो' आणि मुस्लिम व्यापारी आला, तर 'बिस्मिल्लाहीनिर्रहमानिर्रहीम' असे म्हणून आम्ही चोपड्या देतो. व्यापारी वह्या-चोपड्यांची खरेदी करतात. खरे तर दसऱ्यापासूनच चोपड्या-वह्या खरेदीसाठी 'बुकिंग' सुरू होते,' असे तय्यबभाई सांगत होते.
दसरा, पुष्य नक्षत्र, धनत्रयोदशी, दिवाळी यांसारख्या मुहूर्तावर वह्या खरेदी करून त्यांचे दुकानात पूजन केले जाते. 'ऑनलाइन' व्यवहार होत असले, तरी डायऱ्या चोपड्या, वह्या खरेदीला ग्राहकांची आजही पसंती आहे; मात्र खरेदी २५ टक्क्यांनी घटली आहे, याकडे दाऊदभाई अब्दुलअली दुकानाचे अल्ताफभाई चोपडावाला लक्ष वेधतात. 'सध्या 'ऑनलाइन' व्यवहार केले जातात; मात्र 'ऑनलाइन' व्यवहारामुळे मोठ्या कंपन्यांकडून चोपड्यांची मागणी होत नाही. मार्केट यार्डातील घाऊक, किरकोळ विक्रेते, फर्निचर, पालेभाज्या, फूलविक्रेते, मारवाडी, गुजराती, पूजेकरिता खतावणी खरेदी करतात. परंतु, मोठ्या आकाराच्या अर्थात एक हजार पानांपेक्षा मोठ्या वह्या खरेदी केल्या जात नाहीत. आता केवळ ८०० पानांच्या वह्या खरेदी केल्या जात आहेत,' असेही अल्ताफभाई यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट