म. टा. प्रतिनिधी, पुणे
गेल्या पिढीतील कर्तृत्ववान मंडळींबद्दल सरकारच्या असंवेदनशीलतेचा आणखी एक नमुना समोर आला आहे. 'मुंबईचे सिंह'' अशी ओळख असलेल्या सर फिरोजशहा मेहता यांची स्मृतिशताब्दी साजरी करण्यास महाराष्ट्र सरकारने बिनदिक्कत नकार दिला आहे.
लेखक अमेय गुप्ते यांनी मेहतांची १०० वी पुण्यतिथी साजरी व्हावी, याकरिता राज्य सरकारशी पत्रव्यवहार केला होता. मात्र, सरकारने मेहता यांचे योगदान लक्षात न घेता त्याला साफ नकार दिला आहे. आज (गुरुवारी) मेहता यांची १०० वी पुण्यतिथी असून, ती राज्य सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात साजरी व्हावी, अशी विनंती करणारे पत्र गुप्तेंनी महापालिका व राज्य सरकारला दिले होते. मुंबईच्या जडण-घडणीत मेहता यांचे मोठे योगदान असून, मुंबई महापालिकेचे ते संस्थापक होते. इंग्लंडमधून त्यांनी विधी शाखेची पदवी संपादन केली होती. त्यांनी १९०१ मध्ये मराठी आणि गुजराती भाषेमध्ये बीए. व एमए. अभ्यासक्रम आणला, हे त्यांचे कार्य महत्त्वपूर्ण ठरले.
मात्र सरकारला या कार्याचा विसर पडला असून, गुप्ते यांना उत्तरादाखल पाठवलेल्या पत्रामध्ये, 'राष्ट्रपुरुष, समाजसेवक, महनीय व्यक्ती यांच्या जयंती, पुण्यतिथी शासन स्तरावर साजऱ्या होतात. सर्व व्यक्तींविषयी शासनास पूर्णतः आदर असूनही सर्वांचीच जयंती, पुण्यतिथी कार्यक्रम शासन स्तरावर साजरे करणे शक्य नाही. शासकीय कार्यालयांत राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती, पुण्यतिथी अन्य राष्ट्रीय दिनांचे काही निवडक कार्यक्रम साजरे करण्यात येतात. अशा कार्यक्रमांमध्ये आणखी वाढ करण्याचे सरकारचे धोरण नाही. त्यामुळे मेहता यांच्याबद्दल आदर असूनही त्यांची पुण्यतिथी शासन स्तरावर साजरी करण्याची विनंती मान्य करता येणार नाही,' असे म्हटले आहे.
..................
फिरोजशहा मेहता यांची स्मृतिशताब्दी साजरी करण्यात यावी, म्हणून ऑगस्टपासून प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री, मुंबई महापालिका, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वांशी याबाबत पत्रव्यवहार केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यांची पुण्यतिथी साजरी करता येणार नाही, असे उत्तर सरकारकडून दोन दिवसांपूर्वी मिळाले.
- अमेय गुप्ते
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट