म. टा. प्रतिनिधी, पुणे
'अधुऱ्या कहाणी'ची व्यथा सांगणारे 'भातुकली'चे गाणे ४५ वर्षांचे झाले आहे. मराठी भावजीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या या गाण्याने 'मांडलेला डाव' आजच्या पिढीच्या मनाचाही ठाव घेतो आहे. कॅसेट युगापासून सुरू झालेला हा प्रवास आज मोबाइल फोनच्या रिंगटोनपर्यंत येऊन पोहोचला आहे.
'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी' हे गाणे गेली ४५ वर्षे मराठी मनांवर अधिराज्य गाजवते आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर, ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव आणि ज्येष्ठ गायक अरुण दाते या त्रिकुटाने एकत्र येऊन ज्या उत्तमोत्तम गाण्यांनी मराठी भावविश्व समृद्ध केले, त्यात या गाण्याचा समावेश होतो. 'शुक्रतारा मंदवारा' या गाण्यालाही नुकतीच ५० वर्षे पूर्ण झाली. त्याच ध्वनिमुद्रिकेतील 'भातुकलीच्या खेळामधली...' या गीतानेही पंचेचाळीशीचा टप्पा ओलांडला आहे. या त्रिकुटाने मांडलेला भातुकलीचा डाव मोडलेला नसून, आजही रंगलेलाच असल्याची रसिकांची भावना आहे.
'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी,' हे गीत आजही अनेकांच्या ओठी येते. त्यामध्ये या गाण्याच्या पिढीमधीलच नव्हे, तर तरुणांचाही समावेश असतो. तरुणांच्या स्मार्ट फोनवरही हे गाणे वाजते. या गाण्याच्या पंचेचाळीशीच्या निमित्ताने 'मटा'ने ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांच्याशी संवाद साधला.
देव म्हणाले, 'या गाण्याला ४५ वर्षे पूर्ण झाली, हे खरे असले, तरी मी वर्षे मोजत नाही, गाणी मोजतो.' देव यांनी या गाण्याच्या निर्मितीप्रवासाच्या अनेक आठवणी जागवल्या. 'पाडगावकरांनी हे गीत लिहिल्यानंतर त्यास मी चाल दिली. त्यांना आधी ती आवडली नव्हती. त्यांची मी समजूत घातली आणि पुढे जे काही घडले, ते आपल्यासमोर आहे,' असे देव यांनी नमूद केले.
'मी मुंबई आकाशवाणीवर होतो. अरुण दाते विविध भारतीवर हिंदी गाणी गात असत. त्यांनी मराठी गाणे गावे, अशी गळ मी घातली. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर सन १९६२ मध्ये 'शुक्रतारा मंद वारा' या पहिल्या गीताची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. त्यालाही आता ५० वर्षे लोटली,' असे देव यांनी सांगितले.
'मी हिंदी मुलखातला. माझे मराठी उच्चार धड नाहीत. मी हेच काय; पण कोणतेही मराठी गीत म्हणू शकणार नाही,' असे म्हणणाऱ्या अरुण दाते यांनी शेवटी हे भावगीत म्हटले. त्यानंतर अनेक गाणी या त्रिकुटाने केली.
पाडगावकरांची आठवण
'आमच्या घरी एक किस्सा घडला. माझी मुलगी अंजू त्या वेळी कॉलेजमध्ये होती. हे गाणे ऐकून तिच्या मैत्रिणी तिला म्हणाल्या,'अगं, तुझ्या बाबांचा प्रेमभंग झालाय का?' आता हा प्रश्न तिने मला विचारायचा, तर ती तिच्या आईकडे गेली. आईने तिला गमतीने उत्तर दिले, 'तुझे बाबा नुसते रस्त्यावरून चालत गेले ना, तरी त्यांचा दहा वेळा प्रेमभंग होईल.' आमची वास्तवातली राजाराणीची गोष्ट ही अशी होती...' अशा शब्दांत या गाण्याच्या लोकप्रियतेची गंमत मंगेश पाडगावकर नेहमी सांगतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट