>> रवींद्र खरे
भरत नाट्य संशोधन मंदिर या संस्थेचा १२१वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने...
भरत नाट्य मंदिर म्हटले, की डोळ्यांपुढे येतो पुण्यातल्या रंगकर्मी तरुणाईचा राबता. संस्था आणि नाट्यगृह वयस्कर असूनही दिवसरात्र तालमी, एकांकिकांचे प्रयोग, तांत्रिक तालमींमध्ये रंगून गेलेली असते. विचार करता करता मन भूतकाळात जाते आणि लक्षात येते, की अरे 'भरत'ची स्थापनाच १६ वर्षांच्या मुलांनी १२१ वर्षांपूर्वी केली होती. त्याची प्रेरककथा अशी, की त्या काळी ज्याला काही अभ्यासात गती नाही, हातात कसब नाही, दैवदत्त आविष्कार अंगी नाही, अशा मठ्ठ किंवा उडाणटप्पू मुलांना नाटक कंपन्यांमध्ये आणून सोडत. थोडक्यात, वाया गेलेल्या मुलांचे क्षेत्र म्हणजे नाटक, असे सामाजिक समीकरण होते. त्या वेळी दत्तात्रेय फाटक, गोपाळ ज. वाड, वामन ब. काशीकर, दत्तात्रय परांजपे, दातार यांनी हुशार अभ्यासू तरुण वेगळ्या उद्दिष्टांनी नाट्यक्षेत्रात काम करू शकतात हे दाखवून देण्यासाठी 'स्टुडंटस् सोशल क्लब' या नाट्य मंडळाची स्थापना, दसरा १८९४ या दिवशी केली. जवळ काहीही नसताना आणि प्रचंड इच्छा शक्तीच्या बळावर हळूहळू तरुण मंडळी जमा होऊ लागली. पालकांच्या विरोधापेक्षा मुलांचा निर्धार प्रबळ होता.
या पहिल्या हौशी नाट्य संस्थेला समाजमान्यता मिळू लागली. ही सगळी मुलेही ग्रॅज्युएट, वकील, शिक्षक अशा पेशात मान्यता मिळवू लागल्यावर नाटक हे हुशार मुलांचे क्षेत्र आहे, हे समाजाने १९०० सालानंतर मान्य करायला सुरुवात केली. पुढे तर सोशल क्लब नाट्य मंडळांचे सदस्य असणे, प्रतिष्ठेचे झाले. अनेक शिक्षकही सभासद होऊन नाटकात काम करू लागले. अनेक तरुण स्त्रिया प्रथम बॅकस्टेजला मदत करू लागल्या. 'नाटक्या' या तिरस्करणीय शब्दाला हळूहळू लोक विसरू लागले. या तरुणाईचा सर्वांत सुंदर उपयोग नाट्यसंमेलनांच्या सुरुवातीच्या काळात झाला. १९०५ सालापासून संमेलने सुरू झाली. त्या वेळी कोणतीच व्यावसायिक संघटना अस्तित्वात नसल्याने संमेलनांच्या छोट्या-मोठ्या जबाबदाऱ्या उचलून पहिल्या. १० पैकी ६ ते ७ नाट्य संमेलनांच्या यशात सोशल क्लबचा वाटा सिंहाचा होता. हे कार्य निश्चितच विधायक होते आणि म्हणूनच या संस्थेला, लोकमान्य टिळकांसारख्या संघटन सिंहाने आपले मानले. पाठोपाठ सावधगिरी म्हणून ब्रिटिश शासकांनी या संस्थेवर लोक ठेवणे ओघानेच आले. अर्थात, हे घडत होते तरुणांच्या सक्रिय सहभागामुळेच. स्वातंत्र्यानंतर 'स्टुडंटस् सोशल क्लब'चे नाव बदलून भरत मुनींना आदरांजली म्हणून 'भरत नाट्य संशोधन मंदिर' असे केले.
आजही तेच घडते आहे. एकांकिका ही अविष्कार पद्धती आजच्या तरुणांनी जवळची मानली आहे. 'भरत नाट्य मंदिर' या सर्वांची पंढरी आहे. पुरुषोत्तम, फिरोदिया करंडकपासून ते राज्य नाट्य स्पर्धेपर्यंत विविध स्पर्धा याच ठिकाणी होतात. त्यात आंतर बँक एकांकिका स्पर्धा, रोटरी क्लब एकांकिका स्पर्धा, भरत करंडक, आयटी करंडक, कामगार कल्याण स्पर्धा, संस्कृत नाट्यस्पर्धा, एकपात्री बहुरूपी अभिनय स्पर्धा, मौनांतर (मूकनाट्य) स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा असे अनेक प्रयोग भरतमध्ये होतात. कुणी मानो अथवा न मानो, या मंचावर वावरलेल्या गतपिढ्यांची पुण्याईदेखील आहे. म्हणूनच पु.ल. देशपांडे, राजा परांजपे, राजाभाऊ नातू, राजा गोसावी, शरद तळवलकर, चित्तरंजन कोल्हटकर, भक्ती बर्वे या साऱ्यांनी आणि अशा अनेकांनी भरतवर अपेक्षा विरहित प्रेम केले आहे.
आधुनिक युगात जाताना 'भरत'ची मूळ रचना बदलावी, असे कुणालाच वाटत नाही. परंतु, सुविधांमध्ये वाढ व्हायला होणेही गरजेचेच आहे. मूळचेच स्ट्रक्चर वर उचलून, पार्किंगची व्यवस्था करणे अथवा एअरकंडिशन बसवणे, नव्या जमान्याचे लाइट्स कंट्रोल अशा सुविधा करता येऊ शकतात. त्यासाठी सरकार मदत देऊ शकते. ग्रंथालयाच्या कम्प्युटरायझेशनचे काम पूर्ण होत आले असून, दुर्मिळ ग्रंथ डिजिटाइज करणे बाकी आहे. १२५व्या वर्षानिमित्त खास योजना
आखल्या जात आहेत. त्या वर्षी हौशी नाट्य संमेलन घडवण्याचा मनोदय आहे. त्याचेही नियोजन सुरू आहे. अर्थात, तरुणाईच्या सहभागाशिवाय ते शक्य नाही आणि म्हणून लवकरच आम्ही तरुण रंगकर्मींना संपर्क करणार आहोत. दिवसरात्र 'भरत'मध्ये खळाळणारा तारुण्याच्या हा प्रसन्न निर्झर, शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने एखाद्या प्रपातामध्ये रूपांतरित झाला, तर त्याहून मोठे यश कोणते असेल?
(लेखक संस्थेचे विश्वस्त आहेत.)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट