म. टा. प्रतिनिधी, पुणे
स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या टप्प्यात नागरिकांनी शहरातील प्रमुख सहा समस्यांवर केलेल्या मतनोंदणीची माहिती घेतल्यानंतर पुढील टप्प्यात या समस्यांवर उपाययोजना सुचविण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात नागरिकांना पालिकेने सुरू केलेल्या स्मार्ट सिटीच्या वेबसाइटवर येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत या उपाययोजना सुचविता येणार आहेत. शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी अधिकाधिक नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त कुणाल कुमार यांनी केले.
वेबसाइटवर उपाययोजना सुचविताना त्याचे रजिस्ट्रेशन करावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होऊन निधी मिळविण्यासाठी शंभर दिवसांचा टप्पा पालिकेला पार पाडावयाचा आहे. यातील ४५ दिवस पूर्ण झाले आहेत. यात सहभागी होण्यासाठी पालिकेला नागरी सहभागातून समस्या जाणून घेऊन उपाययोजनांचा आराखडा तयार करायचा आहे. यासाठी पहिल्या दोन टप्प्यात नागरिकांकडून शहरातील मूळ आणि अनुषंगिक समस्या जाणून घेण्यात आल्या. दोन्ही टप्प्यांत शहरातील लाखो नागरिकांनी अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या आहेत. दुसऱ्या टप्प्यात पुणेकरांनी सार्वजनिक वाहतूक, पाणीपुरवठा व मलनि:सारण, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण व शाश्वत उपाय, सार्वजनिक सुरक्षितता, ऊर्जा व वीजपुरवठा या समस्यांना प्राधान्य देत सूचना केल्या आहेत.
या योजनेच्या पुढील टप्प्यात नागरिकांना लेखी तसेच ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत या उपाययोजना देता येणार आहे. स्मार्ट सिटीसाठी महापालिकेने सुरू केलेल्या www.punesmartcity.in या वेबसाईटवर २५० शब्दांपर्यंत या उपाययोजना सुचवाव्यात. तसेच महापालिका भवनातील स्मार्ट सिटी सेलमध्ये लिखित स्वरूपात या स्वीकारण्यात येतील, असेही कुमार यांनी स्पष्ट केले. वेबसाईटवर उपाययोजना सुचवताना नागरिकांना लॉग इन करावे लागणार आहे. त्यांनी दिलेल्या सूचना फेसबुकप्रमाणे इतर नागरिकांनाही पाहता येणार असून, त्यावर मतेही नोंदविता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट