गेल्या महिन्यात आळंदी रोडवर बीआरटी सेवा सुरू करण्यात आली. महापालिकेने विश्रांतवाडी येथे बस टर्मिनल उभारणे गरजेचे असताना, त्यासाठी जागा नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात प्रवाशांना बस बदलण्यासाठी सुविधा निर्माण करण्यात आली. परंतु, त्यामुळे पीएमपीला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असून, प्रवाशांची नाराजी ओढवून घ्यावी लागत आहे.
आळंदी रोडपाठोपाठ नगर रोड येथील बीआरटी सुरू करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. नगर रोडवरही खराडी अथवा वाघोली परिसरात टर्मिनल होणे गरजेचे आहे, तरच प्रवाशांना त्याचा फायदा होऊ शकेल. ही जागा पालिकेने अद्याप निश्चित केलेली नाही.
पीएमपीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये २०१४-१५ साठीच्या १६७ कोटी रुपयांच्या संचलनातील तुटीला मान्यता देण्यात आली. ही तूट भरून देण्याची जबाबदारी पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आहे. १६७ कोटींची तूट भरून देण्यासाठी पुणे पालिकेने आणखी ३ कोटी, तर पिंपरीने आणखी ६० लाख दर महिन्याला देण्याची गरज आहे.
२०१४ मध्ये पीएमपीचे दैनंदिन सरासरी उत्पन्न एक कोटी २५ लाख रुपयांच्या दरम्यान होते. ऑगस्ट २०१५ चे सरासरी उत्पन्न १ कोटी ५२ लाख रुपयांवर पोहोचले आहे. प्रवाशांमध्येही एक लाखांनी वाढ झाली असल्याचा दावा पीएमपीचे अध्यक्ष अभिषेक कृष्णा यांनी केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट