शहराच्या विविध भागांत महापालिकेने बांधलेल्या अनेक हॉस्पिटलमध्ये अद्ययावत सुविधा, तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही नागरिकांसाठी त्याचा वापर होत नसल्याबद्दल पालिकेच्या कारभाऱ्यांनीच शुक्रवारी तीव्र नापसंती व्यक्त केली. येत्या १५ दिवसांत ही सर्व हॉस्पिटल्स सुरू करण्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जाव्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने पालिका आयुक्तांकडे केली आहे.
येरवड्यातील राजीव गांधी हॉस्पिटलसह खराडी, बोपोडी, कोथरूड, वानवडी, भांडारकर रोड, पर्वती, हडपसर आणि बी. टी. कवडे रोड अशा विविध भागांत पालिकेने बांधलेल्या हॉस्पिटलची जंत्रीच सभागृहनेते बंडू केमसे यांनी शुक्रवारी सादर केली. तब्बल एक लाख २२ हजार स्क्वेअर फुटांची जागा या हॉस्पिटल्सतर्फे वापरण्यात येत असली, तरी त्यातून पालिकेला कोणताही लाभ होत नाही. हॉस्पिटलच्या जागेचे भाडे अथवा नागरिकांना मोफत सुविधा यापैकी कोणतीच गोष्ट पालिकेला मिळत नसल्याने सर्व हॉस्पिटल्स तातडीने सुरू केली जावीत, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे.
येरवड्यातील राजीव गांधी हॉस्पिटल चालविण्यासाठी डॉ. डीय. वाय. पाटील मेडिकल कॉलेजसोबत करार करण्यात आला आहे; पण त्यातील अटी-शर्तींची पूर्तता झालेली नाही. सर्वसामान्य नागरिकांना या हॉस्पिटलमध्ये कोणतीही सुविधा, वैद्यकीय सेवा मिळत नाही. अटी-शर्तींचा भंग करणाऱ्या हॉस्पिटलसोबत केलेला करारनामा रद्द करावा, असा आग्रह धरण्यात येणार असल्याचे केमसे यांनी सांगितले. अशीच स्थिती इतर हॉस्पिटलबाबत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
नुकसान ४० कोटींचे?
महापालिकेने बांधलेली हॉस्पिटल संबंधित क्षेत्रातील जाणकारांना चालविण्यास देताना, त्यासाठीचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. सर्व हॉस्पिटल्सच्या बांधकाम क्षेत्रफळाचा अंदाज घेतला, तर वर्षाकाठी पालिकेला त्याद्वारे सुमारे १० कोटी रुपये प्राप्त होण्याची गरज आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून ही सर्व हॉस्पिटल्स कुलूपबंद अवस्थेत असल्याने पालिकेचे ४० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा बंडू केमसे यांनी केला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट