स्मार्ट सिटी स्पर्धेतील १० शहरांची यादी आज जाहीर होणार
म. टा. प्रतिनिधी, पुणे
केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' योजनेतील सहभागासाठीच्या राज्य स्तरावरील स्पर्धेत पुणे महापालिका दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्राच्या निकषांनुसारच्या स्व-मूल्यांकनात ठाण्याने अव्वल स्थान प्राप्त केले असून, या स्पर्धेचा सविस्तर निकाल आज, शुक्रवारी मुख्यमंत्र्यांतर्फे जाहीर केला जाणार असून, त्यात राज्यातील दहा शहरांची निवड घोषित केली जाईल.
केंद्राच्या स्मार्ट सिटीतील सहभागासाठी राज्याला १० शहरांची शिफारस करता येणार आहे. त्या अंतर्गत शहरांची निवड करण्यासाठी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. स्मार्ट सिटीसाठी केंद्र सरकारने निश्चित केलेल्या निकषांनुसार प्रत्येक शहराला स्व-मूल्यांकन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. राज्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, सांगली, नवी मुंबई, कोल्हापूर अशा प्रमुख शहरांसह एक लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या इतर शहरे या स्पर्धेत सहभागी झाली होती.
लोकसंख्येच्या प्रमाणात स्वच्छतागृहांची उपलब्धता, ऑनलाइन तक्रार निवारण व्यवस्था, ई-न्यूजलेटर, पालिकेच्या बजेटची माहिती, कर्मचाऱ्यांचे वेतन, ऑडिट, पाणीपुरवठा विभागाचा देखभाल-दुरुस्तीवरील खर्च, भांडवली कामांची माहिती आणि जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजनेअंतर्गत पूर्ण केलेल्या प्रकल्पांचा आढावा, अशा निकषांवर प्रत्येक शहराला स्व-मूल्यांकनाद्वारे गुणांकन निश्चित करायचे होते. त्यावर, आधारित स्वतंत्र सादरीकरणाची संधी देण्यात आली होती. राज्यातील विविध शहरांतर्फे केल्या गेलेल्या स्व-मूल्यांकनात ठाण्याने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ, दुसरे स्थान पुण्याने पटकाविले असून, नागपूर आणि पिंपरी-चिंचवड महापालिका संयुक्तपणे तिसऱ्या क्रमांकावर आहे. मार्च २०१२ पर्यंत जेएनएनयूआरएम अंतर्गत ८० टक्के प्रकल्प पूर्ण करण्यात पुणे पालिकेने यश प्राप्त केले होते. यामध्ये, १० पैकी पाचच गुण पालिकेला प्राप्त झाल्याने पुण्याला अव्वल स्थानापासून वंचित राहावे लागले आहे.
सूट मिळण्यासंदर्भात कागदपत्रांची मागणी
खडकवासला पाटबंधारे विभागाने संस्थेला पाणीपरवाना दिला आहे. हा परवाना देताना बारा लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले होते. आमच्या गरीब शैक्षणिक संस्थेला एवढी रक्कम भरणे शक्य नसल्याने त्यात सूट देण्याबाबत सांगितले होते; पण त्यावर पाटबंधारे विभागाने काहीही केले नाही. त्यासंदर्भातील काही कागदपत्रे आपण पाटबंधारे विभागाकडून मागविली आहेत. ही कागदपत्रे आल्यावर आपण या विषयावर बोलू, असे स्पष्टीकरण एमसीई सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार यांनी दिले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट