पावसाने गेल्या चार आठवड्यांपासून दडी मारल्याने राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये एक हजार ३१६ टँकरने पाणी पुरविण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे. ऐन पावसाळ्यामध्ये १,०३६ गावे आणि १,९२० वाड्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत.
मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड तसेच नाशिक व नगर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. मान्सूनचे राज्यात आगमन झाल्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वत्र पाऊस पडला. मात्र, सलग चार दिवस बरसल्यानंतर पाऊस गायब झाला आहे. गेले चार आठवडे पावसाने दडी मारल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत सर्वाधिक ७५४ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मराठवाड्यातील बीडमध्ये सर्वाधिक ४७१ टँकर, उस्मानाबाद जिल्ह्यात १४९ टँकर, लातूरमध्ये ९२ व नांदेड जिल्ह्यात ७८ टँकर सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात २८, जालन्यात २१ व परभणीमध्ये २१ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. नगर जिल्ह्यात २६० व नाशिकमध्ये ६० टँकर सुरू आहेत. अमरावती विभागातील वाशिम व बुलढाणा जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवत आहे. या दोन्ही जिल्ह्यात ३९ टँकर सुरू आहेत.
टँकरच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता
पुणे विभागातील पुणे जिल्ह्यात २० टँकर, साताऱ्यात २९, सांगलीत १६ व सोलापूर जिल्ह्यात ८ टँकरने पाणी देण्यात येत आहे. पुणे विभागातील ६८ गावे ३९२ वाड्या ऐन पावसाळ्यात तहानलेले आहेत. पावसाची स्थिती आणखी काही दिवस अशीच राहिल्यास टँकरच्या संख्येत वाढ होण्याची भीती आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट