चैत्राली चांदोरकर, पुणे
देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील, अंतराळवीर कल्पना चावला यांसह विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांची उदाहरणे देऊन त्यांची प्रगती झाली... असा भ्रम निर्माण केल्याने स्त्री-पुरुष समानता आली, असे मानण्याचे काही कारण नाही. यशस्वी महिला या केवळ समानतेची प्रतीके आहेत; त्या समाजाचे प्रतिबिंब नाहीत. सगळ्याच स्तरातील महिला आजही पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेच्या दबावात जगत आहेत, हेच वास्तव आहे.
पॉप्युलेशन फर्स्ट या संस्थेतर्फे पुण्यामध्ये नुकतीच 'जेंडर संवेदनशीलता' ही कार्यशाळा आयोजित केली होती. महिला वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदापर्यंत कार्यरत असताना ग्रामीण भागातील, शहरातील वाड्यावस्त्यांमध्ये राहणाऱ्या महिलांचा पितृसत्ताक समाजाविरोधात सुरू असलेल्या लढ्याचे विविध पैलू यामध्ये उलगडण्यात आले. महिलांचे समाजातील स्थान, त्यांच्यावर होणारी हिंसा, लिंगभेद, लिंगभाव, पितृव्यवस्था, महिलांचे आरोग्य आणि माध्यमे अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. पॉप्युलेशन फर्स्टच्या संचालिका डॉ. ए. ल. शारदा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ, वर्षा देशपांडे, जेंडर समानतेचे अभ्यासक मिलिंद चव्हाण, सम्यक संस्थेचे आनंद पवार, मंजूळ भारद्वाज यांसह विविध अभ्यासकांनी मार्गदर्शन केले.
जगभरात जेंडर अर्थात लिंगभाव या विषयावर मोठ्या प्रमाणात चळवळ उभी राहात असताना आपल्याकडील महिलांपर्यंत आजही समानतेची भाषा पोहोचलेली नाही. हिंसाचार आणि पुरुषत्वाचा जवळचा संबंध आहे, या समीकरणाबद्दल महिला अनभिज्ज्ञ आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने अशा प्रकारच्या कार्यशाळा प्रत्येक स्तरातील, वेगवेगळ्या क्षेत्रातील महिलांसाठी सातत्याने आयोजित करण्याची गरज या निमित्ताने प्रकर्षाने जाणवली.
गेल्या काही वर्षांत यशस्वी झालेल्या महिला समाजासाठी समानतेची प्रतीके ठरल्या आहेत. पुरुषसत्ताक व्यवस्थेकडून ही प्रतीके दाखवून स्त्री-पुरुष समानतेचा भ्रम निर्माण केला जातो आहे. प्रतीके निश्चित महत्वाची आहेत. पण जगाला अपेक्षित असलेली 'समानता' ही संख्यात्मक समानता वाढल्याने येते हा गैरसमज आपण दूर केला पाहिजे. आजपर्यंत सरकारने केवळ संख्येवरच काम केले आहे, पितृसत्ताक मानसिकता बदलण्याच्या दृष्टीने आपण खूप मागे आहोत, बहुतांश वक्त्यांच्या मनोगतातून हा मुद्दा पुढे आला.
मुलींच्या जन्मापूर्वीपासूनच तिच्यावर अन्याय सुरू होतो. पुढे बारसे, कुटुंबातील संस्कार, शिक्षण, लग्नापासून ते तिच्या मृत्यूपश्चात होणाऱ्या विधींमध्येदेखील तिला दुय्यम स्थान मिळते. संस्कार, परंपराचे लेबल लावून तू सोशिक, भावनिक आणि जबाबदार व्यक्ती म्हणूनच आचरण केले पाहिजे, हे वारंवार बिंबवले जाते. तिच्या जडणघडणीतच पितृसत्ताक विचारांचे बीज रोवले जाते. तरीदेखील सरकारी योजनांमुळे मुली आज शिकत आहेत. यापुढे त्यांचे साक्षरतेचे प्रमाण वाढत जाणार आहे. शिक्षणाच्या अनेक संधी त्यांना उपलब्ध आहेत, मात्र निर्णय स्वातंत्र्य मिळालेले नाही. लग्न, बाळंतपण, मुलांच्या शिक्षणाचा मुद्दा आला की उच्चशिक्षित महिलांना स्वप्नांना मुरड घालून घरी बसावे लागते. पगार बलाढ्य असला तरी नवऱ्याच्या परवानगीशिवाय खर्च करण्याची मुभा त्यांना नाही. (याला काही कुटुंबात अपवाद असू शकतो, पण संख्या कमी आहे). नोकरदार महिलांची वाढती संख्या पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या डोळ्यावर येते आहे. बदलत्या परिस्थितीनुसार पुरुष बदलण्यास तयार नाहीत. महिला कितीही उच्चपदाच्या नोकरीवर असली तरी, घरी आल्यावर तिने कौटुंबिक जबाबदाऱ्या पाडल्याच पाहिजेत, याबद्दल पुरुष ठाम आहेत. यामुळेच सर्वस्तरात कौटुंबिक हिंसाचार आणि घटस्फोटांचे प्रमाण वाढते आहे.
पितृसत्ताक व्यवस्थेमुळे हिंसाचार
हिंसाचाराची सगळी कारणे पितृसत्ताक व्यवस्थेशी जोडलेली असल्याने महिलांना सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत हिंसाचाराला सामोरे जावे लागते आहे. प्रत्येक स्तरामध्ये हिंसेचे आयाम वेगवेगळे असले तरी मानसिक खच्चीकरण महिलेचे होते. महिला शिकल्या, घराबाहेर पडल्या, पैसे कमावत्या झाल्या म्हणूनच घटस्फोट वाढले, कुटुंब व्यवस्था ढासळली... असा गैरसमज पसरवून पुरुषसत्ताक समाज महिलांची गळचेपी करतो आहे. त्यामुळे महिलांना त्यांचे अस्तित्व आणि पुरुषांना सामाजिक समानता म्हणजे नेमके काय, याची जाणीव करून देण्यासाठी सातत्याने जनजागृतीपर कार्यशाळा झाल्या पाहिजेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट