कुलदीप जाधव, पुणे
भारत देशातील पहिली रेल्वेगाडी धावण्याचा मान असलेला मध्य रेल्वे विभाग आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यामध्ये क्षमता असूनही असमर्थ ठरल्याचे नुकतेच पाहायला मिळाले. मुंबई येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वेची सेवा चार दिवस पूर्णपणे कोलमडली होती. कोणत्या गाड्या रद्द होणार, कोणत्या गाड्या उशिराने धावणार याची माहिती सामान्य प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर गेल्याशिवाय मिळत नव्हती. या दरम्यान, रेल्वे प्रशासनाने हेल्पलाइन म्हणून '१३९' हा रेल्वेचा चौकशी क्रमांक माध्यमांमध्ये प्रसिद्धीसाठी दिला. मात्र, हा क्रमांकही बहुतांश वेळ बंदच लागत होता. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागला.
मध्य रेल्वेने काही दिवसांपूर्वी 'वेकअप कॉल' उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली. यामध्ये प्रवासी तिकीट आरक्षित करताना त्याच्याकडून त्यांचा मोबाइल क्रमांक घेण्यात येणार आहे. प्रत्यक्ष प्रवासाच्या दिवशी त्याने तिकीट काढलेले स्टेशन येण्यापूर्वी काही मिनिट आधी रेल्वेकडून त्याच्या मोबाइलवर कॉल केला जाणार आहे. त्या कॉलवर तुम्ही उतरू इच्छिणारे स्टेशन लवकरच येणार आहे, अशी माहिती दिली जाणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वेने हा एक चांगला उपक्रम हाती घेतला आहे. एकीकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा चांगला वापर आणि दुसरीकडे आपतकालिन परिस्थिती उदभवली असताना प्रवाशांना अपडेट माहिती देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाऐवजी पारंपरिक पद्धतीचा वापर करण्यात आला.
मुंबईहून पुण्याला येणारी इंद्रायणी एक्स्प्रेस पुण्यातून पुढे सोलापूरला जाते. तर, हुतात्मा एक्स्प्रेसही पुणेमार्गे सोलापूरला जाते. या दोन्ही गाड्या रविवारी (दि. २१) नियोजित वेळेत धावणार आहेत का, याची माहिती घेण्यासाठी एका प्रवाशाने रेल्वेच्या '१३९' या क्रमांकावर संपर्क साधला; परंतु फोन लागला नाही. रेल्वेच्या वेबसाइटवर या गाड्यांसंबंधी काही अपडेट आहेत का, ते पाहिले. मात्र, तेथेही काही माहिती मिळाली नाही. अखेर रेल्वे प्रशासनात नोकरीला असलेल्या त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीने त्यांना माहिती दिली. पुण्याहून सोलापूरला जाणाऱ्या गाड्या सुरळीत चालू आहेत. ठरल्याप्रमाणे ती व्यक्ती कुटुंबीयांसोबत पुणे रेल्वे स्टेशनवर पोहोचली, मात्र तेथे गेल्यावर कळाले सोलापूरच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेचे पाच उपविभाग आहेत. मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर आणि भुसावळ. या प्रत्येक उपविभागांमधून मुंबई मार्गावर धावणाऱ्या गाड्या आहेत. त्यामध्ये पुणे ते मुंबई दरम्यान धावणारी डेक्कन क्वीन, मुंबई ते हैदराबादची हुसेनसागर एक्स्प्रेस, मुंबईहून कोलकात्याला जाणारी गीतांजली एक्स्प्रेस, मुंबई ते कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस, पुणे-कोलकाता आझाद हिंद एक्स्प्रेस, मुंबई-बेंगळुरू उद्यान एक्स्प्रेस आणि मनमाडवरून मुंबईला जाणारी गोदावरी एक्स्प्रेस या काही महत्त्वाच्या गाड्या आहेत. राज्यातील प्रत्येक महत्त्वाचे शहर रेल्वे मार्गाने मुंबईला जोडण्याचा हा प्रयत्न करण्यात आला आहे.
त्याबरोबरच ईशान्य कर्नाटकातील काही व दक्षिण मध्य प्रदेशमधील काही रेल्वेमार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतात. मात्र, एवढी मोठी व्याप्ती असूनही सर्वसामान्य प्रवाशांना अद्ययावत माहिती-तपशील उपलब्ध करून देण्याच्या आघाडीवर मध्य रेल्वे निदान पुण्यात तरी 'ऑफट्रॅक'च झाली.
काय करता आले असते?
या परिस्थितीत रेल्वेने एक विशेष हेल्पलाइन सेवा सुरू करणे अपेक्षित होते. या हेल्पलाइनवर प्रवाशांना रेल्वे गाड्यांची सद्यस्थितीची माहिती देण्याची सोय केली पाहिजे होती. 'वेकअप कॉल' प्रमाणे प्रवाशाच्या मोबाइल क्रमांकावर संबंधित गाड्यांबाबतची अपडेटेड माहिती देणे शक्य आहे. त्याबरोबरच अगदी साधा उपाय करायचा झाल्यास प्रत्येक रेल्वे स्टेशनवर एक डेस्क सुरू करायचे. त्या डेस्कचा संपर्क क्रमांत माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोचवायचा आणि तेथून विचारणा करणाऱ्या नागरिकांना माहिती द्यायची, आदी उपाययोजना करता येणे शक्य आहे. मात्र, रेल्वेकडून या प्रकारची कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट