म. टा. प्रतिनिधी, पुणे
शहरात दिवसभर पडलेल्या संततधार पावसाने पुणेकरांनी मंगळवारी 'टिपिकल' पावसाळी वातावरणाचा अनुभव घेतला. सकाळपासूनच शहराच्या विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. दिवसभरातील काही वेळ वगळता सतत हलक्या सरी कोसळत होत्या. पुढील २४ तासात हीच परिस्थिती कायम राहणार असल्याचे पुणे वेधशाळेने सांगितले आहे.
पुण्यामध्ये दिवसभरात २५.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शहरात खऱ्या अर्थाने रविवारी पावसाने दमदाजर हजेरी लावली होती. एक दिवसात ६० मिमी पाऊस पडला. सोमवारी (२२ जून) पावसाने ब्रेक घेतला होता. पण मंगळवारी (२३ जून) पुन्हा जोर धरला. पुढील दोन दिवस शहरात आकाश ढगाळ राहणार असून दिवसभर कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.
मान्सून संपूर्ण राज्यात सक्रीय झाला असून कोकणासह, मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या चोवीस तासात मध्यमहाराष्ट्रात मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक पडला. राज्यात मंगळवारी सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरमध्ये पडला. दरम्यान अरबी समुद्रातील दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीलगतचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. पुढील तीन दिवसात मध्यप्रदेशचा काही भाग, उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाना आणि दिल्ली तसेच राजस्थानाच्या काही भागात मान्सून दाखल होण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
महाबळेश्वरमध्ये
६८१ मिलिमीटर
महाबळेश्वरमध्ये राज्यातील सर्वाधिक म्हणजेच तब्बल १८० मिमी पावसाची नोंद झाली. महाबळेश्वरमध्ये गेल्या तीन दिवसात तब्बल ६८१ मिमी पाऊस पडला आहे. दिवसभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळित झाले आहे. कर्माळामध्ये १३० मिमी, पोलादपूर येथे ११०, उल्हासनगर, माथेरान, चंदगड येथे ९० मिमी पाऊस पडला.
शनिवार पेठेत रस्ता खचला
शहरातील रस्ते खोदाईनंतर करण्यात आलेली दुरुस्तीची कामे निकृष्ट दर्जाची झाल्यावर मंगळवारी पुन्हा शिक्कामोर्तब झाले. शनिवार पेठेतील ओंकारेश्वर रस्त्यावर केलेल्या तात्पुरत्या मलमपट्टीत पालिकेचा खडीचा ट्रकच फसला.
ओंकारेश्वर मंदिर ते नारायण पेठ पोलिस चौकीदरम्यानच्या रस्त्यावर ड्रेनेज लाइनचे काम करण्यात आले होते. त्यानंतर, रस्त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यात आले. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले होते. पालिकेने ते तातडीने बुजविले. मंगळवारी सकाळी मात्र खडी घेऊन जाणारा पालिकेचा ट्रकट येथील खड्ड्यामध्ये फसला. ट्रकची चाकेच रुतून बसल्याने अखेर क्रेन बोलावून फसलेला ट्रक बाहेर काढण्यात आला. हे काम करताना पुरेशी काळजी घेण्यात न आल्यानेच वारंवार रस्ता खचण्याचे प्रकार घडत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली. परंतु, एखादा रस्ता खचला तर त्याविषयी लगेच तक्रार करण्याची गरज नाही, अशा शब्दांत संबंधित पालिकेच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचा दावा फेटाळून लावला.
धरणसाठ्यात अर्धा टीएमसीने वाढ
धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासांत झालेल्या दमदार पावसामुळे खडकवासला प्रकल्पाचा पाणीसाठा एका दिवसात ०.४२ अब्ज घनफुटांनी (टीएमसी) वाढला. या वाढीमुळे प्रकल्पाचा एकूण पाणीसाठा ३.८३ टीएमसी झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणात ७५ मिलिमीटर, पानशेत व वरसगाव धरणात प्रत्येकी ५८ मिमी व खडकवासला धरणात २७ मिमी पाऊस पडला. खडकवासला साखळी प्रकल्पातील धरणांच्या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. तीन दिवसांपूर्वी या प्रकल्पात फक्त २.२६ टीएमसी पाणीसाठा होता. या पावसामुळे धरणांचा पाणीसाठा तब्बल दीड टीएमसीने वाढला आहे. टेमघर धरणात उपयुक्त पाणीसाठ्याला सुरुवात झाली असून या धरणात ०.१० टीएमसी म्हणजे २.७४ टक्के साठा झाला आहे. पानशेतमध्ये २.५९ टीएमसी (२४.३१ टक्के), वरसगाव धरणात ०.७४ टीएमसी (५.७८ टक्के) व खडकवासला धरणात ०.४० टीएमसी (२.३० टक्के) पाणीसाठा आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरणसाठा वाढण्यास मदत होणार आहे.
महामार्गावरील धोका कायम
पुणे : दोन वर्षांपूर्वी कात्रज परिसरातील शिंदेवाडी येथे पाण्याचा प्रचंड लोंढा महामार्गावर येऊन मायलेकी वाहून गेल्या होत्या. डोंगरांवरील खोदकाम, अतिक्रमणांचा अडथळा आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशा व्यवस्थेचा अभाव, यामुळे ही दुर्घटना ओढवली. त्यानंतरदेखील या परिसरातील स्थिती कायमच आहे.
'मटा'ने काही दिवसांपूर्वी फोटो प्रसिद्ध करून त्याकडे लक्ष वेधले होते. त्यानंतर मंगळवारी कोसळलेल्या दरडीमुळे महामार्गावरील
धोका कायमच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे फक्त आदेश
शिंदेवाडीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी रिस्पॉन्स टाइम कमी करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी सौरव राव यांनी मंगळवारी सर्व तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांना दिल्या; परंतु असे कागदोपत्री आदेश बजावतानाच डोंगरफोड रोखण्यासाठी कडक कारवाई करण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरले आहे,
हेच मंगळवारच्या दरडकोसळीने स्पष्ट केले आहे.
महामार्गाच्या आजूबाजूची अतिक्रमणे काढण्यात आली आहेत; तसेच आपत्ती निवारण कक्ष सुरू करण्यात आले आहेत, असे राव यांनी सांगितले. दरड कोसळण्याच्या दुर्घटना वाढत असून, असा प्रकार घडल्यास तत्काळ मदतकार्य सुरू करावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आल्या.
राव यांनी मंगळवारी प्रांतधिकारी व तहसिलदारांची बैठक घेतली. गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. पावसामुळे खंडाळा आणि वेल्ह्यात रस्त्यावर दरडी कोसळण्याच्या घटनांनंतर अधिकाऱ्यांनी तातडीने जागेवर जाऊन मदतकार्य सुरू केले होते, असे त्यांनी सांगितले.
कोथरूड, वारज्यात वीज खंडित
'महापारेषण'च्या फुरसुंगी ते कोथरूड १३२ केव्ही वाहिनीचा वीजपुरवठा बंद पडल्याने मंगळवारी कोथरूड, वारजे, डेक्कन आदी परिसरातील पन्नास टक्के भागातील वीजपुरवठा सव्वादोन तास खंडित झाला. 'महापारेषण'च्या फुरसुंगी उपकेंद्गातून १३२ केव्ही वाहिनीद्वारे कोथरूड विभागात वीजपुरवठा करण्यात येतो. मंगळवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास न्याती परिसरात मृत पक्षी या वाहिनीच्या संपर्कात ( विद्युत बाधित क्षेत्र) आल्याने वीजपुरवठा बंद पडला. परिणामी कोथरूड विभागात होणारा वीजपुरवठा खंडित झाला. सकाळी साडेनऊपर्यंत डेक्कन व कोथरूड परिसरातील पन्नास टक्के भागात एनसीएल व गणेशखिंड उपकेंद्गातून पर्यायी वीजपुरवठा सुरू करण्यात आला. 'महापारेषण'कडून पावसामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून १३२ केव्ही वाहिनीची पाहणी करण्यात आली व सकाळी अकरा वाजता ही वाहिनी कार्यान्वित झाली. त्यानंतर कोथरूड विभागातील सर्व परिसरात वीजपुरवठा सुरळीत झाला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट