म. टा. प्रतिनिधी, पुणे
मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्याला व्हावे, या मागणीसाठी सलग चौथ्या दिवशी पुण्यातील वकिलांनी काम बंद आंदोलन केले. खंडपीठाच्या मागणीसाठी वकिलांनी सोमवारी विधानभवनावर मोर्चा काढला. मंत्रिमंडळामध्ये खंडपीठाबाबतचा प्रस्ताव मांडण्यात यावा, अशी मागणीही पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे करण्यात आली. आज, मंगळवारी पाचव्या दिवशीही वकिलांनी कामबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव मांडण्यासाठी प्रक्रिया असून, या संदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित कायदा विभागाशी चर्चा करू, तसेच मंत्रिमंडळापुढे खंडपीठाचा प्रस्ताव लवकरात लवकर यावा यासाठी आपण जरूर प्रयत्न करू, असे आश्वासन बापट यांनी वकिलांच्या शिष्टमंडळाला दिले. खंडपीठाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी वकिलांनी सोमवारी सकाळी जिल्हा न्यायालयाच्या चार नंबर गेटपासून मोर्चा काढला. विधानभवन येथे दुपारी साडेबारा वाजण्याच्या मोर्चा पोहचला. वकिलांच्या शिष्टमंडळाने विधानभवनात बापट यांची भेट घेऊन निवेदन दिले. वकिलांच्या या शिष्टमंडळात बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष अॅड. हर्षद निंबाळकर, कौन्सिलचे सदस्य अहमदखान पठाण, ज्येष्ठ विधीज्ञ एस. के. जैन, अॅड. भास्करराव आव्हाड, अॅड. के. आर शहा, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश शेडगे, उपाध्यक्ष अॅड. योगेश पवार, अॅड. हेरंब गानू, सचिव अॅड. राहुल झेंडे, असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. बिपीन पाटोळे, अॅड. अतिश लांडगे यांचा समावेश होता.
आंदोलनाचा आज फैसला
मंगळवारीही वकील काम बंद आंदोलन करणार असून, आपली मागणी मान्य न झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय मंगळवारी सायंकाळी होणाऱ्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. जिल्हा न्यायालयातील अशोक हॉलसमोरील लॉनवर सायंकाळी साडेचार वाजता वकिलांची बैठक होणार असून, पुढील धोरण ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गिरीश शेडगे यांनी दिली.
वकिलांचा आणि पक्षकारांचा हायकोर्टातील वेळ आणि पैसा वाचावा या साठी खंडपीठाची आवश्यकता असल्याच्या मागणीला आपला पाठिंबा आहे. मंत्रिमंडळात खंडपीठाचा प्रस्ताव मांडण्यासाठी प्रक्रिया असून, त्यासाठी आपण पाठपुरावा करू.
- गिरीश बापट
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट